परतीचा पाऊस मुंबई ठाण्यासह राज्याच्या अनेक भागात धुमाकूळ घालत कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे अक्षरश: हाल सुरू आहेत. मध्य रेल्वेला या पावसाचा फटका बसला असून उपनगरीय रेल्वे वाहतुकीसह लांब पल्ल्याच्या गाड्यांचेही वेळापत्रक कोलमडले आहे. परिणामी अनेक स्टेशनवर प्रवाशांची गर्दी झाली आहे. मध्य रेल्वेची कुर्ला- घाटकोप – भांडूप दरम्यान लोकलची वाहतूक बराच काळ ठप्प होती. रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं वाहतूक बंद होती. काही वेळाने पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर रेल्वे वाहतूक संथ वेगानं परत सुरू झाल्यांचे कळते आहे.
दरम्यान, दादर हिंदमाता परिसर, अंधेरी सबवे, तसेच मुंबईतील सखल भागातील रस्त्यांवर काही वेळातच पाणी भरल्याचं पाहायला मिळालं. पाण्याचा निचारा होत नसल्यानं पाणी भरल्यानं अनेक ठिकाणी लोकांना नाईलाजानं गुडघाभर पाण्यातून प्रवास करावा लागत असल्याचं पाहायला मिळालं.
रस्ते वाहतूक मंदावल्यानं मुंबईसह उपनगरातील काही रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागून वाहतुकीची कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
तर मुसळधार पावसामुळे मुंबईकडे येणारी काही विमाने अन्य शहरांतील विमानतळांवर वळवण्यात आली आहेत.