Published on
:
02 Oct 2024, 10:30 am
Updated on
:
02 Oct 2024, 10:30 am
मुरुड जंजिरा : सुधीर नाझरे
मुरुड शहरातील भागात रिमझिम पाऊस असो वा ऊन असो रोजच्या रोज वीज पुरवठा खंडित होणे थांबता थांबत नाही. या वीजेच्या समस्यांनी शहरातील नागरिक अक्षर: हैराण झाले आहेत. वीज देता का वीज आसा प्रश्न सध्या मुरुडमध्ये विचारला जात आहे.
नागरिकांना चौवीस तास लाईट मिळावी व विद्युत पुरवठा खंडित होऊ नये त्याकरिता मुरूड दत्तमंदिर जवळ शासनाने लाखो रुपये खर्च करून माजी आमदार पंडीत पाटील यांच्या हस्ते थाटामाटात स्विचिंग सेंटर उभारले गेले. काही वर्ष विद्युत पुरवठा सुरळीत चालला पण गेल्या वर्षा भरात विजेच्या समस्यांनी डोके वर काढले आणि रोजच्या रोज नागरिकांना वीजेच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
बेकरी, दुध डेअरी, आईस्क्रीम पार्लर यांचे विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहेत. वीज स्विचिंग सेंटर बांधुन फायदा काय? ही वीज नक्की जातेय कुठे असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. दर मंगळवारी कामानिमित्त दिवसभर लाईट बंद करायचे त्यावेळी कोणते काम करीत होते असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. विजेची समस्या सुधारावी या करिता अनेक पक्ष कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्तेंकडून निवेदन दिली जातात पण समस्या दूर करण्यास विद्युत महामंडळाचे अधिकार्यांना सफशेल अपयशी ठरताना दिसत आहेत. आता तरी विजेचा कारभार सुधारण्यासाठी लोकप्रतिनिधी लक्ष देणे जरूरी आहे.
या संदर्भात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालय मुरुड उपकार्यकारी अभियंता -सूर्यवंशी यांना कार्यालयात भेटण्यासाठी गेले असता यांची भेट होऊ शकली नाही.त्यांना फोन केला असता ते व्यस्त असल्याने त्यांनी प्रतिसाद न दिल्याने त्यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही.
मुरुड तालुका हा पर्यटनदृष्टया महत्वाचा तालुका आहे. त्यामुळे येथे पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पर्यटन हंगामात येथे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी असते. पर्यटनावर आधारीत विविध सुविधा येथे निर्माण होत आहेत. त्यामुळे तालुक्यात विजेसारखी मूलभूत सुविधा सक्षम असणे आवश्यक आहे. मात्र गेली अनेक वर्षापासून तालुक्यात विजेची समस्या भेडसावत आहे.
मुरुड शहर भागातील इंजिनिअर सतीश खरात यांना विजेचे प्रश्न विचारले असता ते म्हणाले लाईनमध्ये समस्या आहे. त्याचे काम चालू आहे. विद्युत पुरवठा सुरळीत असतो पण मध्येच उपकरणांमध्ये समस्या आली की विद्युत पुरवठा खंडित होतोे अशी प्रतिक्रिया सतीश खरात यांनी दिली. त्यामुळे नादुरुस्त वीज वाहिन्या दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.ो