अवघ्या 7 महिन्यांपूर्वी काँग्रेसला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केलेले बाबा सिद्दीकी यांच्यावरील गोळीबाराने संपूर्ण राज्य हादरलं. शनिवारी रात्री 9.30 च्या सुमारास निर्मलनगर येथे ही घटना घडली. सिद्दीकी यांच्यावर 3-4 गोळ्या झाडण्यात आल्या त्यापैकी एक गोळी ही त्यांच्या छातीला लागली. लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतलं असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. क्राईम ब्रांच मुंबईचे अधिकारी या घटनेचा अधिक तपास करत आहेत. मात्र या गोळीबारामुळे प्रचंड खळबळ माजली असून विरोधकांनी या मुद्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही या हत्याकांडाबद्दल दु:ख व्यक्त करत सरकारला खडसावलं आहे. ‘ गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे’ अशा शब्दांत शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांना चपराक लगावली आहे.
शरद पवार यांचं ट्विट काय ?
X या सोशल मीडिया साईटवरील अधिकृत अकाऊंटवरून शरद पवार यांनी बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केली. ‘ राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे. बाबा सिद्दिकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो’ असे लिहीत शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांनी पायउतार होण्याची मागणी केली आहे.
राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याची केवळ…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 12, 2024