Published on
:
02 Oct 2024, 10:32 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिकेनंतर आयसीसीने ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंनी फलंदाजी आणि गोलंदाजी क्रमवारीत धमाका केला आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा नंबर वन कसोटी गोलंदाज बनला आहे. त्याचे रेटिंग 870 झाले आहे. त्याने एका स्थानावर प्रगती करत आपला संघ सहकारी फिरकीपटू आर अश्विनला मागे टाकले. अश्विनचे आता 869 रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे. या दोघांनी नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी केली आणि प्रत्येकी 11 बळी घेतले. कानपूर कसोटीत बुमराहने 6 आणि अश्विनने 5 बळी घेतले. अश्विनला प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून निवडण्यात आले. 6 विकेट्स घेण्यासोबतच त्याने पहिल्या सामन्यात शतक झळकावले होते.
यशस्वी जैस्वाल तिस-या स्थानी झेप
युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल (792 रेटिंग) यानेही कसोटी क्रमवारीत मोठी प्रगती केली आहे. कानपूर कसोटीच्या दोन्ही डावात जैस्वालने शानदार फलंदाजी करत अर्धशतके झळकावली. त्याला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले. आता तो पाचव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. यशस्वीने बांगलादेश विरुद्धच्या मालिकेत एकूण 189 धावा केल्या. इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूट (899) अव्वल स्थानावर आहे. न्यूझीलंडचा केन विल्यमसन (820) दुस-या स्थानावर आहे.
कोहलीची पुन्हा टॉप 10 मध्ये एन्ट्री
भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली फलंदाजांच्या यादीत टॉप-10 मध्ये परतला आहे. कोहलीने सहा स्थानांची झेप घेतली आहे. तो 724 रेटिंगसह सहाव्या स्थानावर आला आहे. त्याने कानपूर कसोटीच्या पहिल्या डावात 47 तर दुसऱ्या डावात नाबाद 27 धावा केल्या. चेन्नई कसोटीतील खराब कामगिरीमुळे तो टॉप-10 मधून बाहेर पडला होता.
रोहित शर्मा-ऋषभ पंतचे नुकसान
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला (693) पाच स्थानांचे नुकसान झाले आहे. तो 15व्या क्रमांकावर घसरला आहे. 'हिटमॅन' म्हणून प्रसिद्ध असलेला रोहित बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यात केवळ 42 धावा करू शकला. तो गेल्या आठवड्यात टॉप टेनमध्ये होता. प्रदीर्घ कालावधीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करताच ऋषभ पंत सहाव्या क्रमांकावर आला होता, मात्र त्याला फटका बसला आहे. पंत तीन स्थानांनी घसरून नवव्या स्थानावर आला आहे.