अजित पवार यांच्याकडून थेट कुत्र्याची उपमा, मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांची पहिली प्रतिक्रिया काय?

2 hours ago 2

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सोलापुरातील मोहोळमध्ये सारे काही आलबेल नाही हे आता उघडपणे स्पष्ट झालं आहे. अजित पवारांनी आज मोहोळ येथील सभेत पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांना खडेबोल सुनावले. यावेळी अजित पवार यांनी उमेश पाटील यांना थेट कुत्र्याची उपमा दिली. “कोणीतरी पठ्ठ्या म्हणाला दादाचा दौरा मी रद्द केला. अजित पवाराचा दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचा आहे. कुत्र्याला वाटत असतं मी बैलगाडी ओढतोय. पण अरे ते बैल गाडी ओढत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अचानक दौरा आला म्हणून मी मोहोळचा दौरा रद्द केला”, असं अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या या टीकेनंतर आता उमेश पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. “अजित पवारांचा दौरा मी रद्द करायला लावला, असं मी कधीही म्हणालो नाही. अनगरच्या राजन पाटलांनी त्यांना चुकीची माहिती दिली. दादांचा दौरा रद्द करण्याएवढा मी मोठा नाही, जर दादा माझं ऐकत असते तर मोहोळच्या आमदाराचे तिकीट रद्द केलं असतं”, असं उमेश पाटील यांनी स्पष्ट केलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करणार, असा इशारा दिलाय. त्यावरही उमेश पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले की, पक्षविरोधी काम करणाऱ्यावर कारवाई करणार. पण तशी कारवाई करणार असाल तर आधी आमदार यशवंत माने यांच्यावर कारवाई करावी लागेल. कारण आमदार यशवंत माने हे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांना गाडीत घेऊन फिरतात. सरकारकडून आलेल्या निधीच्या विकासकामांचे उद्घाटन शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांना घेऊन करतात. त्यामुळे आमदार यशवंत माने यांची पक्षातून पहिल्यांदा हकालपट्टी केली पाहिजे”, असं उमेश पाटील म्हणाले.

नेमका वाद काय?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज सोलापुरातील मोहोळमध्ये लाडकी बहीण योजनेचा दौरा आयोजित करण्यात आला होता. अजित पवार यांच्या दौऱ्याआधी अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्द्यावरुन मोहोळ बचाव संघर्ष समितीकडून बंदची हाक देण्यात आली होती. अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनीच संघर्ष समितीच्या वतीने बंदची हाक दिली. मोहोळचे अजित पवार गटाचेच माजी आमदार राजन पाटील आणि उमेश पाटील यांच्यात राजकीय संघर्ष आहे. राजन पाटील यांच्या अनगर गावी अप्पर तहसील कार्यालय आमदार यशवंत माने यांनी मंजूर केलं आहे. त्यामुळे त्यालाही उमेश पाटील यांचा विरोध आहे. दादा आपसे बैर नहीं, राजन तेरी खैर नहीं, असं म्हणत उमेश पाटील यांनी बंद पुकारला. मोहोळ बंदच्या हाकेवरुन आज अजित पवारांनीच उमेश पाटील यांना खडसावलं. मी आखलेला दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचा आहे, असं अजित पवार म्हणाले. या राजकीय संघर्षामुळे अजित पवार गटातील अंतर्गत दुफळी समोर आली आहे.

मोहोळ तालुक्यातील इथली माणसं मेलीत का? उमेश पाटलांचा सवाल

“यशवंत माने हा इंदापूरमधील असून त्याला मोहोळमध्ये बोलण्याचा काय अधिकार? यशवंत माने कोणाच्या मेहरबानीवर आमदार झाला आहे, आम्ही देखील त्याला निवडून आणले आहे. यशवंत मानेला उमेदवारी द्यायला, मोहोळ तालुक्यातील इथली माणसं मेलीत का? अजित दादा राष्ट्रीय अध्यक्ष आणि सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष असताना मोहोळची उमेदवारी जाहीर करणारा राजन पाटील कोण लागून गेला? राजन पाटील हा आमच्या पक्षाचा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष झालाय का? सर्व देशाचा अध्यक्ष राजन पाटील आणि अजित पवार केवळ भारताचे अध्यक्ष असं आहे का? मुळात पक्षाची पार्लमेंटरी बोर्डाची मीटिंग झालेली नसताना राजन पाटलाने कोणत्या अधिकारात उमेदवारी जाहीर केली?”, असे प्रश्न उमेश पाटील यांनी उपस्थित केले.

‘कारवाई करणार असाल तर खुशाल करा’

“मी अजित पवारांसोबत आहे. पक्षात माझी देखील 20 वर्षांची तपश्चर्या आहे. ज्यांनी अजित पवारांचे पुतळे जाळले त्यांचं ऐकून माझ्यावर कारवाई करणार असाल तर खुशाल करावी”, अशी स्पष्ट भूमिका उमेश पाटील यांनी मांडली. “मोहोळ बंदचा निर्णय हा उमेश पाटलाचा एकट्याचा नसून मोहोळवासियांचा होता. मोहोळ बचाव संघर्ष समितीच्या वतीने सामूहिकपणे हा निर्णय घेतलेला आहे. अनगरचे अप्पर तहसील कार्यालय करण्याचा निर्णय राजन पाटील आणि यशवंत माने यांचा आहे. तो निर्णय चुकीचा असल्याची भावना अजितदादांपर्यंत पोहोचावी म्हणून मोहोळ बंदचा निर्णय घेतला”, असं उमेश पाटील म्हणाले.

‘राजन पाटलांनी अजित दादांचा पुतळा का जाळला?’

“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या पहाटेच्या शपथविधीनंतर राजन पाटील आणि त्यांच्या दोन मुलांनी अजित पवारांचे पुतळे जाळले होते. तेव्हापासूनच राजन पाटलांच्या विरोधात मी भूमिका घेतली. मात्र दुर्दैवाची गोष्ट की, त्याच लोकांच्या व्यासपीठावरून माझ्यावर कारवाईची मागणी केली जाते. मग राजन पाटलांनी अजित दादांचा पुतळा का जाळला याचा काय खुलासा केला? मुळात अजित दादांवर प्रेम म्हणून राजन पाटील पक्षात आले की सत्तेसाठी? दादांकडे सत्ता नसती तर राजन पाटील आले असते का? हा प्रश्न अजितदादांनी स्वतःच्या अंतर्मनाला विचारावा. जर सत्ता नसती तर उमेश पाटील अजित दादांना सोडून गेला असता का? हा प्रश्न देखील अजित दादांनी स्वतःच्या अंतर्मनाला विचारावा”, अशी भूमिका उमेश पाटील यांनी मांडली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article