Published on
:
24 Sep 2024, 12:07 am
Updated on
:
24 Sep 2024, 12:07 am
कोल्हापूर : ‘ईडी’ प्रकरण कुणामुळे झाले, हे त्यांना माहीत पाहिजे, त्यांच्या कार्यक्रमाला त्यांनी जायला नको होते, अशा शब्दात वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर पलटवार केला. मतदारसंघात किती चुरस होती, ते निवडणुकीच्या निकालानंतर कळेल, असेही त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
‘ईडीची कारवाई झाली, तेव्हा कागलमध्ये पुरुष मंडळी ईडीला घाबरून मागे राहिली. पण, घरातील माझी महिला भगिनी धैर्याने पुढे आली. कागलची जनता हे कदापि मान्य करणार नाही’, असा टोला खा. सुळे यांनी मुश्रीफ यांना पिंपरी चिंचवड येथील एका कार्यक्रमात लगावला होता. त्यावर मुश्रीफ यांनी पलटवार केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला, अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढण्याच्या चर्चा या निरर्थक आहेत. विधानसभा निवडणूक महायुती म्हणून लढवली जाणार आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीने चार जागांवर दावा सांगितला आहे. भाजपही पाच जागांवर दावा सांगत आहे, मग शिवसेनेला एकच जागा मिळणार का? यावर मुश्रीफ म्हणाले, किती जागा मागाव्यात हा पक्षाचा निर्णय आहे. शेवटी निवडून येण्याच्या गुणवत्तेवर निर्णय होईल.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे, ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके यांच्यासह धनगर समाजाचे ही आंदोलन सुरू आहे. याबाबत विचारता निवडणुकीच्या तोंडावरील या आंदोलनात महायुतीचे सरकार समन्वयाने तोडगा काढेल, असेही त्यांनी सांगितले. तर निवडणुकीपूर्वी मतदार संघातील मुंबई येथील मतदारांचा मेळावा घेतो, यावेळी त्याला अपेक्षेपेक्षा जादा प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी बोगस मतदार नोंदवल्याच्या तक्रारी आहेत, त्यावर अशा तक्रारी जिल्हाधिकार्यांकडे करावी, त्यावर कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.