महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना राज्यातील महायुती सरकारमधील जागावाटपाची चर्चाही अंतिम टप्प्यात आली आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकांचे सत्र गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत महायुती एकसंध राहणार का ? हा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज महायुतीच्या प्रमुख पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद मुंबईत घेण्यात आली. महायुतीच्या पत्रकार परिषदेसाठी भाजपकडून प्रसाद लाड, शिवसेनेकडून शंभुराज देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस कडून माजी खासदार आनंद परांजपे व शिवाजीराव गर्जे उपस्थित होते.
फेक नरेटिव्हला फेक नरेटिव्हनेच उत्तर देणार असल्याचं शिवसेना शिंदे गटाचे नेते, मंत्री शंभूराज देसाई म्हणाले. आमच्यात कुठलीही रस्सीखेच नाही असंही त्यांनी जागावाटपाच्या मुद्यावर बोलताना स्पष्ट केलं.
विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आपापल्या पक्षांतर्गत बैठका झाल्या, महायुती म्हणून आम्ही एकत्रदेखील बैठका घेतल्या. सर्वप्रथम 288 मतदारसंघात महायुतीचे समन्वयक नेमण्यात आले आहेत. महायुतीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय असावा यासाठी नेमणुका करण्यात आल्या आहेत. कोणतीही नाराजी, गैरसमज राहू नयेत याची जबाबदारी समन्वयकांवर देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
आमच्यात कुठलीही रस्सीखेच नाही
महायुतीत संपूर्णत: समन्वय आहे. तिन्ही पक्षातील राज्यातील प्रमुखांना सर्व बाबतीत सर्वाधिकार देण्यात आलेले आहेत,असे देसाई म्हणाले. उमेदवारी मागणं लोकशाही जिवंत असल्याचं प्रमाण आहे. आमच्यात कुठलीही रस्सीखेच नाही असं विधान शंभूराज देसाई यांनीा जागावाटपाच्या मुद्यावर बोलताना केलं.