भाजपचा महाराष्ट्रात 'मध्य प्रदेश' पॅटर्न:निरीक्षकांनी बंद लिफाफ्यात 3 इच्छुक उमेदवारांची नावे पाठवली, त्यापैकी एकाची लागणार लॉटरी

2 hours ago 1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने प्रथमच मध्य प्रदेश पॅटर्न राबवला आहे. या अंतर्गत पक्षाच्या निरीक्षकांनी राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील 3 इच्छुक उमेदवारांची नावे बंद लिफाफ्यात पक्षश्रेष्ठींकडे पाठवली असून, त्यापैकी एकाला उमेदवारीची लॉटरी लागणार असल्याची माहिती आहे. भाजपच्या या राजकीय हुशारीची राज्यात खमंग चर्चा रंगली आहे. राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचा फड रंगणार आहे. सध्या सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू आहे. त्यातच दुसऱ्या बाजूला उमेदवारांची चाचपणीही केली जात आहे. भाजपने राज्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय इच्छुकांची चाचपणी केली होती. त्यानंतर प्रत्येक मतदारसंघातील 3 इच्छुक उमेदवारांची नावे पक्षश्रेष्ठींना पाठवली आहेत. आता पक्षश्रेष्ठी या लिफाफ्यांतील 3 पैकी एका उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करतील, अशी माहिती भाजपच्या गोटातून मिळाली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे भाजपने मध्य प्रदेशातही उमेदवारी देण्याचा हाच पॅटर्न राबवला होता. त्याचे त्यांना इच्छित फळही मिळाले होते. त्यानंतर आता महाराष्ट्रातही हाच प्रयोग राबवला जात असल्यामुळे भाजपच्या विद्यमान आमदारांसह उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या अनेक नेत्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. भाजप अधिकाधिक जागांसाठी आग्रही दुसरीकडे, भाजपने महायुतीत अधिकाधिक जागा मिळवण्याचीही रणनीती आखली आहे. भाजपने राज्यात 155 हून अधिक जागा लढवाव्यात असा त्यांचा हट्ट आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसनेही अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्याचा निर्धार केल्यामुळे भाजपला नेमक्या किती जागा मिळणार? हे अजून स्पष्ट झाले नाही. पण सूत्रांनी भाजप किमान 150 जागांसाठी आग्रही असल्याचा दावा केला आहे. जिंकून येणारा उमेदवार सांगा, जागा घ्या भाजपने शिवसेनेकडे त्यांच्या जिंकून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारांची नावे मागितल्याचीही चर्चा आहे. शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांचे विद्यमान आमदार असलेल्या विधानसभा मतदारसंघाशिवाय नवी जागा हवी असेल तर तिथे त्यांचा जिंकण्याची क्षमता असणारा उमेदवार कोण? हे जाणून घेऊनच त्यांना ती जागा सोडण्यावर भाजप विचार करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना महायुतीच्या जागावाटपाचा 80 टक्के पेर सुटल्याचे स्पष्ट केले. उर्वरित 20 टक्के पेपर चर्चा करून सोडवला जाईल, असेही त्यांनी या प्रकरणी नमूद केले. हे ही वाचा... काँग्रेस संजय राऊत यांना जाब विचारणार:पटोलेंनी स्वबळाच्या भाषेचा घेतला समाचार; दुसऱ्याला पोर झाल्याने आनंदी होऊ नका, शिंदेंना टोला मुंबई - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. संजय राऊत यांना त्यांनी काँग्रेसविषयी केलेल्या विधानाचा जाब विचारला जाईल. विशेषतः त्यांचा आजचा अग्रलेख हा वस्तुस्थितीला धरुन होता की त्यांनी तो मुद्दामहून लिहायचा म्हणून लिहिला हे ही त्यांना विचारले जाईल, असे ते म्हणालेत. वाचा सविस्तर

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article