जि.प. चे पाचही अधिकारी कार्यमुक्त:नवे येणारे अजूनसुद्धा जागचे हलले नाहीत, प्रशासन पुन्हा प्रभारींच्या भरवशावर

3 hours ago 2
जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि चार बीडीओ असे पाचही अधिकारी दोन दिवसांपूर्वीच कार्यमुक्त झाले. परंतु त्यांच्या जागेवर येणारे नवे अधिकारी मात्र अद्याप त्यांच्या जुन्या जागांवरुन हलले नाहीत. त्यामुळे जि.प. मध्ये सध्या अधिकाऱ्यांचा अनुशेष निर्माण झाला असून पुन्हा एकदा प्रभारीराज निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर जि.प. प्रशासन नव्या अधिकाऱ्यांची प्रतीक्षा करीत आहे. कार्यमुक्त झालेल्या चार अधिकाऱ्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीराम कुळकर्णी, धामणगाव रेल्वेच्या बीडीओ माया वानखेडे, भातकुलीचे बीडीओ प्रफुल्ल भोरखडे, धारणीचे बीडीओ एस.बी. रायबोले व अंजनगाव सुर्जीचे बीडीओ विनोद खेडकर यांचा समावेश आहे. धामणगाव रेल्वेच्या वानखेडे वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे त्याच पदावर रुजू झाल्या आहेत. तर भातकुलीचे भोरखडे हे अकोटला, धारणीचे रायबोले हे दारव्ह्याला आणि अंजनगाव सुर्जीचे खेडकर हे वाशिम जिल्ह्यातील मालेगावला बीडीओ म्हणून रवाना झाले आहेत. याऊलट नव्याने येणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये धारणीसाठी यु.जे. कुसुरकर (कवठेमहांकाळ, जि. सांगली) अंजनगाव सुर्जीसाठी एस.एल. खताळे (नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर), अमरावतीसाठी छत्रपती संभाजीनगरचे बीडीओ एस.बी. तुपे, चिखलदऱ्यासाठी बुलडाणा जि.प. मधील जलजीवन मिशनचे डेप्युटी सीइओ एस.डी. भारसाकळे आणि दर्यापुरसाठी सोलापुरचे डेप्युटी सीइओ इशाधीन शेळकंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु यापैकी एकही अधिकारी त्यांच्या जुन्या जागेवरुन हलला नाही. त्यामुळे कार्यमुक्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या रिक्तपदांचा पदभार इतरांवर सोपविण्यात आला आहे. यांच्याकडे सोपविला गेला अतिरिक्त पदभार खेडकर यांच्या बदलीमुळे अंजनगाव सुर्जी येथील बीडीओचा पदभार एबीडीओ कल्पना जायभाये यांच्याकडे सोपविण्यात आला असून अमरावतीचा एबीडीओ पी.आर. वानखडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. धामणगावचा चांदूर रेल्वेच्या बीडीओ तेजश्री आवळे, धारणीचा अचलपुरचे बीडीओ सुधीर अरबट यांच्याकडे सोपविण्यात आला असून जलजीवन मिशनचा पदभार चांदूर रेल्वेचे एबीडीओ संजय खारकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यांच्याकडे हा पदभार दिला जाण्याची ही दुसरी वेळ आहे. अमरावतीने आदेश पाळले, इतरांनी नाही बदली झालेल्या व नव्याने येणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्वरेने कार्यमुक्त होऊन नव्या जागांवर रुजू व्हावे, असे त्यांच्या आदेशात म्हटले आहे. शिवाय संबंधित जिल्हा परिषदांच्या सीइओंनाही तसे आदेश देण्यात आले आहेत. अमरावतीच्या सीइओंनी हे आदेश पाळले. परंतु नवे अधिकारी अद्याप अमरावतीत न आल्यामुळे इतर जिल्ह्यांचे चित्र वेगळे आहे, असे म्हणायला वाव आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article