Published on
:
23 Sep 2024, 10:51 am
Updated on
:
23 Sep 2024, 10:51 am
कसारा : इस्लाम धर्मविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नितेश राणे व रामगिरी महाराज यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी एमआयएम पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर ते मुंबई तिरंगा संविधान रॅली आयोजन करण्यात आले आहे.
इस्लाम धर्माविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी विविध ठिकाणी 58 गुन्हे दाखल असून देखील पोलीस प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी तसेच त्वरीत कारवाई करण्याकरीता तिरंगा संविधान रॅली काढण्यात आली. संभाजीनगर येथून इम्तियाज अली यांच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांचा ताफा मुंबईच्या दिशेने निघाला असून समृद्धी महामार्ग मार्गे कसारा घाट परिसरात दाखल झाला आहे. भिवंडी, ठाणे ,मुंब्रा या परिसरातील सर्व कार्यकर्त्यांना कसारा मध्ये एकत्र बोलवण्यात आले आहे. कसारापासून मुंबई, नाशिक महामार्गाने मुंबईकडे रवाना झाले आहेत.
कसारा घाटाच्या पायथ्याशी एमआयएमची हजारो वाहने मुबई कडे रवाना होत असल्याने पोलीसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. pudhari news network
आगामी विधानसभा निवडणूक येत्या काही महिन्यांत होतील. त्या अनुषंगाने प्रत्येक पक्ष तयारीला लागला आहे. याचे औचित्य साधून एमआयएम या पक्षाने (MIM) देखील शक्ती प्रदर्शन केले आहे.
कसारा घाटाच्या पायथ्याजवळून एमआयएमचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या शेकडो वाहनांनी संपूर्ण रस्ता व्यापला. त्यामुळे रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांचे लक्ष वेधले गेले. ही वाहने मुंबईच्या दिशेने आगेकूच करत असून कार्यकर्त्यांमधील मरगळ दूर करुन त्यांच्यामध्ये उत्साह व्दिगुणीत करण्यासाठी देखील एमआयएमने असे शक्ती प्रदर्शन करून "हम भी है जोश है" असा संदेशच याद्वारे दिला आहे.
कसारा घाटातून एमआयएम पक्षाच्या वाहनांचा ताफ्यामुळे वाहतूकीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठीचा पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. येथील मार्गावरुन सुरळीतपणे वाहतूक सुरु असून पोलिसांचा त्यावर वॉच आहे.