Hingoli:- हिंगोली तालुक्यातील चिंचोली शिवारामध्ये नापिकी व कर्जाला कंटाळून शेतकऱ्यांनी(Farmer) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात रविवारी २२ सप्टेंबरला सायंकाळी अकस्मात मृत्यूची (sudden death) नोंद करण्यात आली आहे.
बासंबा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली तालुक्यातील चिंचोली येथील शेतकरी गणेश अर्जुन झाडे (४७) यांना चार एकर शेत आहे. तसेच त्यांच्या पत्नीच्या नावे दोन एकर शेत आहे. या शेतामध्ये त्यांनी सोयाबीन कापूस घेतला आहे. मात्र जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. लागवडीच्या खर्चही निघणे कठीण झाल्यामुळे उदरनिर्वाह कसा करावा तसेच बँकेचे कर्ज कसे फेडावे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला होता. त्यामुळे मागील काही दिवसापासून ते अस्वस्थ झाले होते. दरम्यान शनिवारी ता. २१ रात्री शेतात जागलीसाठी जातो असे घरी सांगून ते शेतात गेले होते. रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ते शेतातून घरी आलेच नाही त्यामुळे त्यांचा मुलगा शेतात पाहण्यासाठी गेला असता गणेश यांचा मृतदेह शेतातील आखाड्यामध्ये गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. याघटनेची माहिती मिळताच बासंबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत भिंगारे, उपनिरीक्षक किसन आडे, जमादार प्रवीण राठोड, खंडेराव नरोटे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी सचिन झाडे यांच्या माहितीवरून बासंबा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतक गणेश झाडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार असल्याचे पोलिसांनी सांगितले.