कल्याणीनगर परिसरात भरधाव पोर्शे कार चालवून तरुण-तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन बिल्डरपुत्राला वाहतूक सुरक्षिततेवर तीनशे शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगून तत्काळ जामीन देणार्या बाल न्याय मंडळाच्या दोन सदस्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. एल. एन. धनवडे आणि कविता थोरात अशी त्यांची नावे आहेत. राज्य शासनाने याबाबातची अधिसूचना काढून पदाच्या अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत दोन सदस्यांना सेवेतून हटविले आहे.
याप्रकरणात, निबंध लिहिण्याच्या अटी, शर्तीवर जामीन मंजूर केल्यानंतर या सदस्यांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. समितीने दोन सदस्यांविरोधात प्रक्रियात्मक त्रुटी, गैरवर्तन आणि नियमांचे पालन न करणे आदी नमूद करत शासनाकडे अहवाल सादर केला होता. या अहवालाची दखल घेत राज्य शासनाने अधिसूचनेत पदाच्या अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई केली. दरम्यान, महिला व बाल कल्याण कडून बाल न्याय मंडळाच्या सदस्यांची तीन वर्षाकरिता नियुक्ती केली जाते. जर सदस्यांचे वर्तन नियमबाह्य असल्यास त्यांची नियुक्ती रद्द केली जाऊ शकते. त्यानुसार बाल न्याय मंडळाच्या सदस्यांना सेवेतून हटविण्यात आले असल्याचे महिला व बाल कल्याण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.