पटसंख्या वाढवण्यासाठी नावीण्यपूर्ण सूचनांची राज्यव्यापी अंमलबजावणी:जिल्हा नियोजन भवनात उपक्रमशील शिक्षकांचे चर्चासत्र

2 hours ago 1
उपक्रमशील शिक्षक व शिक्षण क्षेत्रात प्रदिर्घ सेवा देणाऱ्यांकडून नाविण्यपूर्ण सूचना प्राप्त होत आहेत. प्रामुख्याने शासकीय शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी आलेल्या सुचनांची राज्यव्यापी अंमलबजावणी जाणीवपूर्वक करण्यात येईल, अशी ग्वाही गुरुवार ६ रोजी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. जिल्हा नियोजन भवनात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीसह उपक्रमशील शिक्षकांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटिवार, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, विभागीय मंडळाचे अध्यक्ष अनिल साबळे, शिक्षण उपसंचालक निलिमा टाके उपस्थित होते. विद्यादानाचे कार्य करणारे शिक्षक हे मानबिंदू आहेत. असंख्य अडचणी आणि समस्यांचा सामना करीत शिक्षक नाविण्यपूर्ण उपक्रम राबवित आहेत. शिक्षकांकडील अशैक्षणिक कामे कमी करण्याबाबतही समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांना येणारे छोटे प्रश्न येत्या काळात सुटलेले असतील. शिक्षक, संस्थाचालक यांच्या अडचणींची नोंद घेण्यात आली आहे. याबाबत येत्या काळात निर्णय घेण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरणाला समोर जाताना टप्प्याटप्प्याने सीबीएसईमध्येही शिक्षण व स्थानिक विषयांना प्राधान्य देण्यात येणार आहे. शैक्षणिक सुधारणा करताना लोकसहभाग महत्वाचा आहे. यातून शैक्षणिक समस्यांसह विद्यार्थ्यांचे आरोग्याचे प्रश्नही मार्गी लावण्यात यावेत. जिल्हा नियोजनमधून शालेय शिक्षणासाठी ३ टक्के निधी राखीव आहे. यातून शाळा दुरूस्ती, नवीन वर्ग खोल्या बांधकाम हाती घेण्यात यावे. यावर्षीपासून शाळांच्या संरक्षण भिंती बांधण्याचे काम रोहयोमधून करण्यात येणार आहे. तसेच शाळांनी जलजीवन मिशनमधून पिण्याच्या पाण्याची सोय करावी. गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षणासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही शालेय शिक्षण मंत्र्यांनी केले. शिक्षण उपसंचाक टाके यांनी प्रास्तविकातून विभागाचा आढावा सादर केला. साबळे यांनी सादरीकरण केले. तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्ंयानी शिक्षण विषयक सादरीकरण केले. यावेळी उपक्रमशिल शिक्षक अविनाश नरवाडे, राकेश मडावी, राजू शिंदे, सिद्धार्थ ठोंबरे, ललित बुरे, अंजली देव, अंकुश गावंडे, नागेश वारे, प्रमोद ठोंबरे, वजाहत अली, बांगर यांनी नवोपक्रमाचे सादरीकरण केले. दरम्यान सकाळी भुसे यांनी मोझरी येथील तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळी भेट देऊन अभिवादन केले. यावेळी आश्रमाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच विविध शाळांना भेटी दिल्या. शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना शाळा भेटीतून स्वच्छता, पोषण आहाराच्या काही समस्या जाणवल्या. त्यामुळे त्यांनी जिल्ह्याच्या शिक्षण विभागापुढे शाळा स्वच्छतेसह पोषण आहाराच्या समस्यांबाबत तातडीने योग्य कारवाई व्हावी असे निर्देश देत अनुचित प्रकार घडल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. शालेय शिक्षण मंत्र्यांनी गुरुकुंज मोझरी येथील श्री गुरुदेव विद्यामंदिर, तसेच अमरावती शहरातील जिल्हा परिषद गर्ल्स हायस्कूलला भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. सोबतच त्यांच्यातील कला, गुण जाणून घेत त्यांचे कौतुक केले.सोबतच शिक्षकही प्रतिकूल परिस्थितीत ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. याची दखल घेऊन चांगले कार्य करणाऱ्यांचे कौतुक करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article