वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू Pudhari File Photo
Published on
:
24 Sep 2024, 6:09 pm
Updated on
:
24 Sep 2024, 6:09 pm
मानवत : डॉ सचिन चिद्रवार
मुसळधार पावसावेळी झाडाखाली उभे असलेल्या दोन शेतमजुराचा अंगावर वीज पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना झरी शिवारात मंगळवारी (दि.24) सायंकाळी साडेचार च्या सुमारास घडली. दिगंबर केशवराव सत्वधर (वय.२९) आणि संतोष झांबरे (वय.२८) अशी मृत शेतमजूरांची नावे आहेत.
मानवत शहर व परिसरात मंगळवारी (दि.24) सायंकाळी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह व विजांचा गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. या पावसात झरी येथील दिगंबर आणि संतोष हे दोन शेतमजूर झरी शिवारातीलच बालाजी रतकंठवार यांचे शेतात बैल चरण्यासाठी गेले होते. पाऊस आल्यामुळे ते बैलांना बाजूला सोडून निवाऱ्यासाठी एका झाडाखाली जाऊन थांबले. यावेळी एक विज कडकडून त्यांच्या अंगावर पडली व यात या दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
रात्री उशिरापर्यंत बैल चारण्यास गेलेले दोघेही परत न आल्याने गावात याची चर्चा सुरू झाली. रात्री त्यांचा शोध घेणे सुरू झाले. या शोध मोहिमेत दोघेही शेतात एका ठिकाणी विजेच्या धक्क्याने मृत्यू पावल्याचे लक्षात आले. घटनेचे वृत्त गावात कळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी रीघ लावली. पोलीस ठाणे मानवत येथे माहिती मिळाल्यानंतर मानवत पोलीस ठाण्याचे शेख मन्नू व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते. रात्री ९:३० च्या सुमारास मानवत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनसाठी आणण्यात आले.