भगवी पताका, पालखी अन् दिंडीने गुरुकुंजमध्ये वेधले भाविकांचे लक्ष:पुण्यतिथी महोत्सव सुरु; गुरुदेव भक्तांसह विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती

2 days ago 2
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या ५६ व्या पुण्यतिथी महोत्सवास श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम येथे महासमाधीजवळ मंगळवारी पहाटे साडेचार वाजता प्रारंभ झाला. या प्रसंगी सामुदायिक ध्यानानंतर गुरुकुंज आश्रमातून राष्ट्रसंतांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या वेळी श्रीगुरुदेव मानवसेवा छात्रालयाच्या विद्यार्थ्यांनी मानकर स्वामी, सुधीर कडू व प्रतिक बारी यांच्या मार्गदर्शनात महाकाल दिंडी, टाळ, पदन्यास नृत्य सादर कले. विद्यार्थ्यांच्या या कलेने उपस्थित गुरुदेव भक्तांना मंत्रमुग्ध केले. संत शंकर महाराज यांच्या हस्ते तीर्थस्थापना, चरण पादुका पूजन व महासमाधी अभिषेकाने गुरुदेवाच्या गजरात राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी महोत्सवाला पहाटे साडे चार वाजता धार्मिक व विधिवत प्रारंभ झाला. या वेळी गुरुकुंजातील राष्ट्रसंतांच्या समाधी स्थळी परिसरातील हजारो गुरुदेव भक्तांची उपस्थिती होती. चरण पादुका पूजन व महासमाधी अभिषेकप्रसंगी भजन, मंत्रघोष व शंख नादाने परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते. तीर्थ स्थापनेनंतर सामुदायिक ध्यानाचा कार्यक्रम महासमाधी स्थळी घेण्यात आला. या वेळी शंकर महाराज यांनी सामुदायिक ध्यानाच्या महत्त्वावर चिंतन केले. चिंतनप्रसंगी शंकर महाराज म्हणाले, राष्ट्रसंतांची समाधी सर्वांचे प्रेरणास्थान आहे. जीव व शिवाचा संयोग म्हणजे समाधी. या समाधीमुळे जीव शिवाचा समन्वय होऊन आत्म साक्षात्काराचा भाव जागृत होतो. तसेच समाधी स्थळाच्या दर्शनातून बंधुत्व प्रेमभाव व प्रसन्नता निर्माण होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनेक विषयावर व्यापक विचार आहे. त्याचे शब्दांमध्ये मला वर्णन करता येणार नाही. त्यामुळे निर्विकारपणे एकाग्र होऊन चिंतन करत त्यांच्या चरणी लीन होणे आवश्यक आहे. राष्ट्रसंतांनी आपल्या गतिमान आयुष्यात सर्व धर्माचा अभ्यास करून सामुदायिक ध्यान व प्रार्थनेची निर्मिती केली आहे. यथार्थ ज्ञान प्रगट होण्यासाठी जीवनाचे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता सर्वांनी नियमितपणे सामुदायिक ध्यान व प्रार्थना करणे महत्त्वाचे आहे, असे आवाहन त्यांनी गुरुदेव भक्तांना केले. सामुदायिक ध्यानानंतर काढण्यात आलेल्या दिंडीचे संयोजन अमोल बांबल यांनी केले. या वेळी अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या संचालक मंडळांच्या अध्यक्ष पुष्पा बोंडे, सर्वाधिकारी लक्ष्मण गमे, प्रचार प्रमुख प्रकाश वाघ, उपसर्वाधिकारी दामोदर पाटील, सरचिटणीस जनार्दन बोथे, अॅड. दिलीप कोहळे, गोपाल कडू, बाबाराव पाटील, कार्यकारिणी सदस्य तथा हजारो गुरुदेव भक्त उपस्थित होते. राष्ट्रसंतांची व शिवाच्या वेशभूषेने वेधले लक्ष राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या दिंडीत यावली शहीद येथील कार्यकर्त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची वेशभूषा धारण करत उपस्थितांचे लक्ष वेधले, तर भोळ्या शंकराच्या वेशभूषेने अनेकांना महादेवाचे दर्शन घडल्याची प्रचिती आली आहे. डॉ. सूर्यप्रकाश जयस्वाल चिंतन आज पुण्यतिथी महोत्सवा दरम्यान बुधवारी (दि. १६) पहाटे साडेपाच वाजता सामुदायिक ध्यानावर डॉ. सूर्यप्रकाश जयस्वाल चिंतन करतील. सकाळी ७ वाजता योगाचार्य अक्षय धानोरकर हे गुरुदेव भक्तांना योगाचे धडे देतील. ८ वाजता प्रतिक बारी यांचे ग्रामगीता प्रवचन, ११ वाजता आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा, सायंकाळी ६ वाजता सामुदायिक प्रार्थनेवर अरविंद राठोड यांचे चिंतन, रात्री सव्वा सात वाजता तिवसा येथील सद््गुरू आडकोजी महाराज भजन मंडळाद्वारा खंजिरी भजन, ८ वाजता चंद्रपूर येथील श्रीगुरुदेव महिला भजन मंडळाचे खंजिरी भजन व रात्री सव्वा नऊ वाजता गजानन दिघडे यांचे कीर्तन होईल.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article