साकोली शहराच्या मध्यभागी असलेल्या मालगुजारी तलावाला मोठे भगदाड पडले. Pudhari Photo
Published on
:
24 Sep 2024, 10:09 am
Updated on
:
24 Sep 2024, 10:09 am
भंडारा: पुढारी वृत्तसेवा : साकोली शहराच्या मध्यभागी असलेल्या मालगुजारी तलावाला मोठे भगदाड पडले. त्यामुळे या भगदाडातून मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या विसर्ग सुरू आहे. हा तलाव फुटल्यास साकोली शहराला मोठा धोका निर्माण होण्याची भीती आहे.
साकोली शहराच्या मध्यभागी असलेला गाव तलाव हा जुना मालगुजारी तलाव आहे. पूर्वी हा तलाव सुमारे १०० एकर परिसरात पसरलेला होता. कालांतराने या परिसरात अतिक्रमण होत गेल्याने तलावाची अंदाजे २० टक्के जागा अतिक्रमणाच्या विळख्यात गेली. यावर्षी पावसाच्या जोर खूप असल्यामुळे हा मालगुजारी गाव तलाव पाण्याने तुडूंब भरलेला आहे. याच परिसरात तलावाच्या पाळीवर सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. मासेमारी करण्याच्या उद्देशाने अंदाजे ३० लाख खर्चून मत्स्य बिजाई टाकलेली आहे. याच तलावाच्या पाण्याने तलाव वार्ड व आमराई परिसरातील शेती स्थानिक शेतकऱ्यांमार्फत पिकवली जाते.
तलावाची पाळ फुटल्यास मत्स्य बिजांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान तर होईलच. परंतु, सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसेल. याशिवाय तलावाच्या खालच्या भागात असलेल्या लोकवस्तीत पाणी शिरुन जिवितहानी होण्याची भीती आहे. सध्या तलावातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. प्रशासनाने वेळीच निर्णय घेऊन गाव तलावाची पाळ तत्काळ दुरुस्त करून द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी मच्छीमार बांधव व नागरिकांनी केली आहे.