मुलींनी आई वडीलांशी मैत्रीपूर्ण अन् सुसंवादाचे नातं ठेवावे:मनविसेच्या मी अबला नव्हे रणरागिणी उपक्रमात माजी सहायक पोलिस आयुक्त बुधवंत यांचे प्रतिपादन‎

2 hours ago 1
मुली व महिलांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन मुलींमध्ये जनजागृती व सुरक्षिततेच्या उपाययोजनांची माहिती देणे आवश्यक आहे. मुलींनी स्वतःची सुरक्षा स्वतः करण्यासाठी आधी मनाची तयारी करणे गरजेचं आहे. विद्यार्थिंनींनी अडचणी व प्रसंगांवर मात करण्यासाठी आई वडिलांशी मैत्रीपूर्ण सुसंवादाचे नातं ठेवावे. मुलींनी या सर्व गोष्टींचा विचार केला तर सुरक्षेचे पर्याय आपोआप तयार होतील, असे प्रतिपादन माजी सहायक पोलिस आयुक्त बाबासाहेब बुधवंत यांनी केले. अहिल्यानगर शहरातील तसेच जिल्ह्यातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींमध्ये स्वतःची सुरक्षा स्वतःच कशा पद्धतीने करायची यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने ‘मी अबला नव्हे रणरागिणी’ या महिला सशक्तीकरण उपक्रमास सुरवात करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत पहिले लेक्चर नगर तालुक्यातील दरेवाडी येथील मळगंगा माध्यमिक विद्यालयात झाले. यावेळी माजी सहायक पोलिस आयुक्त बाबासाहेब बुधवंत यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. यावेळी मनविसेचे राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा, जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड, शाळेच्या मुख्याध्यापिका हेमलता मगर, विशाल बेरड, तेजस कराळे आदींसह विद्यार्थिनी उपस्थित होत्या. बुधवंत म्हणाले, पोलिस प्रशासनाला ११२ क्रमांकवर फोन लावून तुम्ही तुमच्या अडचणी बाबत तात्काळ तक्रार करा. मुलींनी आसपासच्या घटनांबाबत मित्र मैत्रिणींशी संवाद साधणे गरजेचे आहे. यातून जागृती निर्माण होते. मुलींनी शाळेत घडत असलेल्या घटनांबाबत शाळा प्रशासनाकडे भीती न बाळगता व्यक्त होणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळा वाचा न फुटल्यामुळे त्या घटना वाढण्याची शक्यता असते. प्रास्ताविकात प्रकाश गायकवाड म्हणाले, बदलापूर सारख्या घटना थांबविण्यासाठी लहानपणीच मुलींचे सशक्तीकरण करणं गरजेचं झाले आहे. त्यांना चांगले वाईट यातील फरक आणि स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःच कश्या पद्धतीने तयार राहता येईल या बद्दल प्रशिक्षण देण्यासाठी मनविसेने पुढाकार घेतला आहे. सुमित वर्मा म्हणाले, शाळा व महाविद्यालयातील भगिनींच्या सुरक्षिततेसाठी मनविसे तत्पर आहे. त्यांच्यात जागृती व्हावी यासाठी हा उपक्रम तालुक्यासह जिल्हाभर अविरतपणे चालू राहणार आहे. मुलींच्या सुरक्षेबाबत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेणार नाही. त्यांच्या मागे आम्ही खंबीरपणे कायम उभे राहू.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article