मनोज जरांगे-पाटीलFile Photo
Published on
:
09 Oct 2024, 5:14 am
Updated on
:
09 Oct 2024, 5:14 am
येवला : येथील मुक्तिभूमीवर रविवारी (दि. १३) धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिन साजरा होणार आहे. त्यानिमित्त शनिपटांगणावर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण मराठा आंदोलक मनोज जरांगे - पाटील यांनी स्वीकारले आहे.
पक्षाचे महेंद्र पगारे यांनी अंतरवली सराटी येथे पाटील यांची भेट घेतली. मुक्तिभूमीवर भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून येवला येथील (Yeola) शनिपटांगणावर सभा होणार आहे. याप्रसंगी तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पगारे यांनी केले आहे.
म्हणून 'येवला' मुक्तीभूमी...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील नाशिक (Nashik) जिल्ह्यातील काळाराम मंदिर सत्याग्रह (Kalaram Mandir) आणि येवला येथे केलेली धर्मांतराची घोषणा महत्वाच्या घटना मानल्या जातात. 13 ऑक्टोबर 1935 ला येवला येथील कोर्टाजवळील मैदानावर सभा भरविण्यात आली. अस्पृश्यांची मुंबई इलाखा सभा म्हणून ही सभा ओळखली गेली. या सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या त्यांच्या भाषणात समस्त जनाला हादरवून सोडणारी घोषणा केली. ती म्हणजे 'मी हिंदू धर्मात जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही'. ही धर्मांतराची ऐतिहासिक घोषणा म्हणजे भारतीय इतिहासात लिहिलं गेलेलं एक महत्त्वाचे पान. येवला येथील कोर्टाजवळील मैदानावर केली, त्यानंतर या जागेला विशेष महत्व प्राप्त झाले, म्हणूनच या जागेला मुक्तीभूमी म्हणून ओळखले जाते.