विखे पाटील कारखान्याने 75 वर्षांच्या वाटचालीमध्ये शेतकऱ्यांचे हित जपले:कारखान्याच्या बॉयलर प्रदीपन प्रसंगी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचे मत‎

3 days ago 3
सहकारी साखर कारखानदारीतील ७५ वर्षांची यशस्‍वी वाटचाल डॉ. विखे पाटील कारखान्‍याने पूर्ण केली. संकटांना सामोरे जात शेतकरी सभासदांच्‍या हितासाठी कारखान्‍याने केलेली कामगि‍री महत्त्वपूर्ण आहे. या यशामध्‍ये कामगारांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले असल्‍याचे प्रतिपादन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्‍याच्‍या बॉयलर अ‍ग्निप्रदीपन कार्यक्रम मंत्री विखे यांच्‍या उपस्थितीत झाला. कामगारांच्‍या वतीने मंत्री विखे यांची लाडुतूला करण्‍यात आली. माजी मंत्री अण्‍णासाहेब म्‍हस्‍के, जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्ष शालिनी विखे, कारखान्‍याचे चेअरमन कैलास तांबे, प्रवरा बँकेचे चेअरमन डॉ.भास्‍करराव खर्डे, व्‍हाईस चेअरमन सतीश ससाणे, मच्छिंद्र थेटे, नंदू राठी, कार्यकारी संचालक महेश कोनापुरे यांच्‍यासह सर्व संचालक याप्रसंगी उपस्थित होते. मंत्री विखे म्‍हणाले, पद्मश्री डॉ. विखे पाटील यांनी सहकार चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. या तत्‍वानेच आशिया खंडातील पहिला साखर कारखाना उभारुन शेतकऱ्यांना न्‍याय देण्‍याची भूमिका केली. या चळवळीपुढे अनेक आव्‍हाने उभे राहीली. मात्र सामान्‍य माणसाच्‍या विश्‍वासावर या चळवळीची वाटचाल यशस्‍वीच होत गेली. पद्मश्रींचा विचार आणि लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे यांच्‍या संस्‍काराने आपण सर्व कार्यकर्ते या चळवळीशी जोडून राहिलो, याचा अभिमान वाटतो. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्‍याची ७५ वर्षांची वाटचाल हा आपल्‍या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे. एकाही गळीत हंगामात कारखाना आपण बंद पडू दिला नाही. या सर्व संकटांवर मात करण्‍यासाठी कामगारांनीही साथ दिली. त्‍यामुळेच या भागाचे उज्ज्वल भवितव्‍य घडू शकले. गणेश कारखाना आपण चालवायला घेतला. यामागे सुध्‍दा सहकार चळवळ टिकून राहावी हाच उद्देश होता. आपण पुढाकार घेतला नसता, तर शेतकरी आणि सभासदांच्‍या मालकीचा हा कारखाना केव्‍हाच खासगी झाला असता. पृथ्‍वीराज चव्‍हाण मुख्‍यमंत्री असताना आपण याबाबतचे धोरण घ्‍यायला भाग पाडले. त्‍यामुळेच कवडीमोल भावात सहकारी साखर कारखान्‍याची विक्री यामुळे थांबली गेली. यापुढे उपपदार्थ निर्मितीवर लक्ष द्यावे लागेल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्‍या माध्‍यमातून सहकारी चळवळीला संरक्षण मिळत आहे. भविष्‍यात केवळ ऊस गाळपावर कारखान्‍यांचे अर्थकारण टिकू शकणार नाही. यामुळेच उपपदार्थांच्‍या निर्मितीवर लक्ष केंद्रीत करावे लागेल. केंद्र सरकारने घेतलेले इथेनॉलचे धोरण हे शेतकरी हितासाठी उपयुक्‍त ठरेल, असा विश्‍वास मंत्री विखे यांनी व्यक्त केला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article