विविध स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून नव्याने पदवी अभ्यासक्रमाची रचना:डॉ. काशीनाथ बऱ्हाटे यांचे प्रतिपादन; शिवाजी महाविद्यालयात व्याख्यान

8 hours ago 2
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना विद्यार्थ्यांना विविध कौशल्य सहज आत्मसात करता यावीत. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेकरता स्पर्धात्मक दृष्टिकोनातून त्यांना पदवी अभ्यासक्रमाचा जास्तीत जास्त फायदा व्हावा, या दृष्टीकोनातून नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे, असे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. काशीनाथ बऱ्हाटे यांनी येथे सांगितले. श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पदवी व पदव्युत्तर मराठी विभागाच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर व्याख्यानाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी डॉ. बऱ्हाटे बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास तायडे होते. तर डॉ. अशोक इंगळे, डॉ. अनिल बाभुळकर, प्रा. अनुकेश धुमाळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. डॉ. बऱ्हाटे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी पदवी अभ्यासक्रम पूर्ण करून स्पर्धा परीक्षेकडे वळावे. नंतरही त्यांना त्रास होऊ नये म्हणून भाषिक दृष्टिकोनातून तो त्यांच्या स्पर्धा परीक्षेला कामात यावा, हा उदात्त दृष्टिकोन लक्षात घेऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. त्याकरता अभ्यास मंडळातील सर्व सदस्यांना फार मेहनत करावी लागली आणि अत्यंत कमी वेळेत तो विद्यापीठाला सादर करावा लागला. आज विद्यार्थ्यांशी अभ्यासक्रमाबद्दल संवाद साधण्याकरता आलो. विद्यार्थांच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले असतील तर ते त्यांनी मोकळेपणाने सांगावेत म्हणजे आपल्याला पुढे ही अभ्यासक्रमात सुधारणा करता येतील असेही त्यांनी प्रतिपादन केले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी मराठी विभागाच्या वतीने डॉ. काशीनाथ बऱ्हाटे यांचा प्राचार्य डॉ. सुनील पांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ. विलास तायडे यांनी काशीनाथ बऱ्हाटे यांचा परिचय करुन दिला. प्रास्ताविक डॉ. अशोक इंगळे यांनी केले. तर आभार प्रा. अनिल अंबाळकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला डॉ. अनिल बाभुळकर प्रा. अनुकेश धुमाळे आदी उपस्थित होते. धोरणाची अंमलबजावणी हळूहळू होणार एकविसाव्या शतकातील नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अन्वये शैक्षणिक नियमांमध्ये तसेच प्रशासकीय व्यवस्थांमध्ये अनेक सुधारणा व अमुलाग्र बदल नमूद करण्यात आले आहेत. या धोरणाची अंमलबजावणी हळूहळू होणार असून, यासाठी सरकारने विविध समित्या आणि कार्य संघाची स्थापना केली आहे. या धोरणाची यशस्वी अंमलबजावणी शिक्षण क्षेत्रात मोठे परिवर्तन घडवेल आणि विद्यार्थ्यांना त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य मार्गदर्शन दिले जाणार आहे,असे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास तायडे यांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article