सौर उर्जेवरील सिंचनाची प्रणाली शेतकऱ्यांसाठी ठरणार लाभदायी:कुलगुरू डॉ. पाटील यांचे प्रतिपादन, विद्यापीठाचा 100 किलोवॅट सोलर प्रकल्प‎

2 days ago 2
शेतीला अखंडित व पुरेशा दाबाने वीज पुरवठा होत नसल्यामुळे पिकांचे पाणी व्यवस्थापन वेळेवर करणे शक्य होत नाही.त्यामुळे सौर उर्जेवरील सिंचन प्रणाली शेतकऱ्यांसाठी लाभदायी आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी केले. राहुरी महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कृषि अभियांत्रिकी विभागातील सेंटर ऑफ एक्सलन्स- स्मार्ट व काटेकोर शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञान प्रकल्पाने आयोजित केलेल्या सौरऊर्जेवरील सिंचन प्रणाली या एक दिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते.कुलगुरू डॉ.पाटील म्हणाले, कृषी विद्यापीठाच्या ४०० एकर क्षेत्रावर १०० किलोवॅट सोलर प्रकल्पाचे काम सुरू आहे.राहुरी कृषि विद्यापीठातील सेंटर ऑफ एक्सलन्स अद्ययावत व काटेकोर शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञान या प्रकल्पाच्या माध्यमातून आतापर्यंत २८२ प्रशिक्षणार्थींना जबलपूर येथील बिसा संस्थेत सौर उर्जेवर आधारित सिंचन प्रणालीचे प्रशिक्षण देण्याकरिता पाठवण्यात आले आहे. नवी दिल्ली येथील बीसा या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अरुण जोशी म्हणाले, शेतकऱ्यांसमोर अनंत अडचणी आहेत. यात प्रामुख्याने मुख्य समस्या शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वेळेवर न होणे ही आहे. यासाठी अखंड व पुरेशा दाबाने वीजपुरवठा होत नसल्याने उत्पादनात घट येते. यावर जबलपूर येथील बीसा केंद्राने जी.आय. झेड.च्या मदतीने सोलरवरील प्रशिक्षणे सुरू करून मार्ग शोधला आहे. सौर पंपाच्या वापराने पाण्याची समस्या सुटेल व खऱ्या अर्थाने शेतकरी सुखी होईल. आपली कृषि संस्कृती जपण्यासाठी सौर ऊर्जेचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे जोशी यांनी म्हटले. या कार्यशाळेत शास्त्रज्ञ तसेच व्याख्याते यांनी सौर ऊर्जेवरील सिंचन प्रणाली या विषयावरील विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. विठ्ठल शिर्के, डॉ. गोरक्ष ससाणे, डॉ. मुकुंद शिंदे, डॉ. साताप्पा खरबडे, बीसा, जबलपूर येथे सौर ऊर्जेवरील प्रशिक्षण घेतलेले शेतकरी, विद्यार्थी तसेच विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. भगवान देशमुख यांनी, तर आभार डॉ. सुनील कदम यांनी मानले. सौर ऊर्जेचा वापर हा पर्याय महत्त्वाचा ठरणार शेतीच्या सिंचन पद्धतीसाठी सौरऊर्जा उपयोगी ठरू शकते. या विषयावर राहुरी कृषि विद्यापीठाने लक्ष केंद्रित करून संशोधन सुरू केले. खंडित वीजपुरवठा व आहे ती वीज पुरेशा दाबाने नसणे यावर सौर ऊर्जेचा वापर हा पर्याय महत्त्वाचा ठरणार आहे, असे डॉ. सुनील गोरंटीवार म्हणाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article