'स्वराज्य पक्ष' लोकसभा लढवणार होता:पण शाहू महाराजांमुळे थांबला, संभाजीराजे छत्रपती यांची स्पष्टोक्ती; महाराष्ट्र दौरा करणार

2 hours ago 1
स्वराज्य पक्ष लोकसभा निवडणुकीच्या वेळीच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होता. पण स्वतः छत्रपती शाहू महाराज मैदानात उतरल्यामुळे आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला, अशी स्पष्टोक्ती संभाजीराजे छत्रपती यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. शाहू महाराजांना निवडून आणण्यात माझा किती वाटा होता हे काँग्रेस नेते सतेज पाटील यांना विचारा, असेही ते यावेळी म्हणाले. संभाजीराजे छत्रपती यांनी गुरुवारी शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी करवीर निवासीनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना आपली लोकसभा निवडणुकीलाच मैदानात उतरण्याची इच्छा होती असे स्पष्ट केले. ते म्हणाले, पत्रकारांची मला नेहमीच अडचणीत आणण्याची इच्छा असते. स्वराज्य पक्ष लोकसभेलाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होता. पण स्वतः छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या मैदानात उतरले. त्यामुळे मी थांबलो. आता शाहू महाराजांना निवडून आणण्यात माझा किती वाटा आहे? हे सतेज पाटील हेच सांगू शकतील. पहिले आंदोलन अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे संभाजीराजे पुढे म्हणाले, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या स्थापनेला 3 दिवस झाले. स्वराज्य संघटना म्हणून आम्ही यापूर्वीही समाजकारणात होतो. पण आता स्वराज्य पक्ष म्हणून मार्गक्रमण करत आहोत. स्वराज्य पक्षाचे पहिले आंदोलन हे अरबी समुद्रात शिवस्मारक झाले का? हे पाहण्यासाठी आहे. त्यानंतर 11 तारखेला पुण्यात पक्षाचा लॉन्चिंग सोहळा आहे. तद्नंतर नाशिक, नांदेड आणि महाराष्ट्रचा दौरा होईल. शिवस्मारकाविषयी माझा मंत्री चंद्रकांत पाटील यांना एकच प्रश्न आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन केले. मग जलपूजनापूर्वी सर्व परवानगी का घेतल्या नाही? तुम्ही परवानगी न घेता जलपूजन कसे काय केले? आता त्यांनी संभाजीराजे यांनी सर्व परवानग्या घेऊन द्याव्यात असे म्हणू नये. संभाजीराजे पुढे म्हणाले, तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून 288 लढवण्याचा मानस आहे. या प्रकरणी पुन्हा बैठक होईल. त्यात कोण कुठे लढणार यावर सखोल चर्चा होईल. कोल्हापुरातील 2 प्रमुख नेत्यांचा तिसऱ्या आघाडीत समावेश आहे. पण अजूनही त्यांच्यात कोणतीही सविस्तर चर्चा झाली नाही. आम्ही एकत्र बसून पुढील लाईन ठरवू. कायदा सुव्यवस्थेवर सरकार गंभीर नाही का? संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी राज्यातील ढासळल्या कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावरून महायुती सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्रात सुरक्षा व्यवस्था अतिशय वाईट पद्धतीने ढासळत चालली आहे. या महाराष्ट्राकडे आदर्श राज्य म्हणून पाहिले जायचे. या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज व संतांचा वारसा आहे. त्या महाराष्ट्रात लैंगिक शोषणाच्या घटना घडले वेदनादायी आहे. सरकार यासंबंधी गंभीर का नाही? हा प्रश्न आहे, असे ते म्हणाले. मनोज जरांगेंपुढे केवळ दोन मार्ग संभाजीराचे छत्रपती यांनी यावेळी मनोज जरांगेंनाही आपल्यासोबत येण्याचे आवाहन केले. मनोज जरांगे पाटील व माझा उद्देश एकच आहे. त्यामुळे त्यांनी पाडापाडी करण्यापेक्षा आपले उमेदवार कसे निवडून आणता येईल हे पाहावे. त्यांनी पाडापाडीची भूमिका घेऊ नये, असा वडिलकीचा सल्ला मी त्यांना दिला. त्यांच्यापुढे दोनच पर्याय आहेत. एक त्यांनी आमच्यासोबत यावे किंवा दोन स्वतंत्र लढणे. लक्ष्मण हाके यांना टोला दरम्यान, संभाजीराजे यांनी यावेळी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी त्यांच्यावर केलेली टीकाही फेटाळून लावली. आज नवरात्र आहे. त्यामुळे मी कुणआविषयी चर्चा करावी किंवा कुणाविषयी काय बोलावे याला काही मर्यादा आहेत. 1947 सालीच राजेपण संपले आहे. मी संभाजी भोसले आहे मी संभाजी छत्रपती आहे, असे ते म्हणाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article