उतलो, मातलो घेतला वसा टाकला माय...:गाणे असे असायला हवे होते, प्रचार गीतावरुन भाजपचा उद्धव ठाकरेंना टोला

2 hours ago 1
विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी रणशिंगे फुंकले आहे. विविध पक्षांकडून मोर्चेबांधणी करण्यात येत असून आपल्या पक्षाचे थीम साँग लॉन्च करण्यात येत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाने देखील घटस्थापनेच्या दिवशी 'असुरांचा संहार कराया मशाल हाती दे.. सतवरी भूवरी ये ग अंबे.. सतवरी भूवरी ये' हे प्रचार गीत लॉन्च केले. या प्रचार गीतावरून भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उतलो गं माय, मातलो गं माय, घेतला वसा टाकला गं माय, असे हे गाणे असायला हवे होते, असा टोला आशिष शेलार यांनी आपल्या सोशल मीडियावरुन लगावला आहे. आशिष शेलार यांनी गाण्याचे बोल असलेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना वारकऱ्यांची वारी रोखण्याचा तसेच लालबागच्या राजाची परंपरा न राखण्याचा उल्लेख केला आहे. देवीचा कोप झाल्यामुळे उद्धव ठाकरेंची सत्ता, पक्ष आणि चिन्ह गेले, असेही शेलार यांनी यात म्हटले आहे. आशिष शेलार यांनी शेअर केलेल्या बोल खालीलप्रमाणे उतलो माय...मातलो गं माय... घेतला वसा टाकला गे माय... गणपतीची आरती हातात घेतली नव्हती पांडुरंगाची तुळसी माळ गळ्यात घातली नव्हती पंढरपुरात जाणारी वारकऱ्यांची वारी रोखली होती लालबागच्या राजाची परंपरा राखली नव्हती... हे कुलस्वामिली एकवीरा आई मुख्यमंत्री झाल्यावर.. तुझी पायरी सुद्धा दुरुस्त केली नव्हती अहंकाराच्या दैत्याने घेरले होते माय... सत्ता गेली...पक्ष गेला, चिन्ह गेल. तुझा कोप झाला गं माय... आता जाग आली माय म्हणून म्हणतो... दार उघड बये... दार उघड... माझ्याती अहंकाराला जाळण्यासाठी सत्वरी भूवरी ये..अंबे उदो...उदो...उदो... काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रचार गीत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज लॉन्च झाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. गेली 2 अडीच वर्षे आम्ही न्याय मंदिराची दारं ठोठावत आहोत, हात दुखायला लागले. न्याय देवतेवर विश्वास आहे पण अजूनही न्याय मिळत नाही. मग आम्ही जगदंबेला साकडे घालायचे असे ठरवले की, आता तू तरी आता दार उघड, असे उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यात माजलेल्या अराजकतेचा नायनाट करण्यासाठी एक अराजकीय गाणे आपण जगदंबेसाठी तयार केले आहे. एकूणच राज्यामध्ये जी काही तोतयागिरी चाललली आहे. त्यांचा नायनाट करण्यासाठी हे गाणे जगदंबे चरणी सादर करत आहोत. गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यांचा फडशा आपण दसरा मेळाव्याला पाडू असे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article