सध्या ऊस पिकाला हुमणी आणि उणी या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. हुमणीने उसाच्या मुळ्या खाल्ल्यामुळे ऊस सुकून गेला आहे. त्यामुळे ऊस उत्पादनात घट होणार असून विविध कीटकनाशकांसह औषधांची फवारणी करूनही उणीचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त बनला आहे.
मुबलक पाणी व ऊस पिकाला मिळणारा हमीभाव यामुळे आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड केली जाते. सध्या अनेक गावांमध्ये उसाला हुमणीचा प्रादुर्भाव जाणवत असून 8 ते 12 महिन्यांच्या उसाच्या मुळ्या हुमणीने खाल्ल्याने ऊस वाळून जात आहे. त्यामुळे उसाच्या उत्पादनात घट होणार आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणात खर्च करून पाण्यातून औषध सोडत आहेत. तरीही हुमणीचा प्रादुर्भाव कमी होत नाही. त्यामुळे एकंदरीतच उसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. यावर्षी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने 3 हजार 200 रुपये प्रतिटन उसाला बाजारभाव दिला आहे. त्यामुळे पुढील वर्षी चांगला बाजारभाव मिळेल, अशी शेतकर्यांना आशा आहे. मात्र, हुमणी आणि उणीच्या संकटाने शेतकरी पुरता धास्तावला आहे.