Published on
:
23 Sep 2024, 5:56 am
Updated on
:
23 Sep 2024, 5:56 am
मुंबई : गंभीर आजारांसोबतच किरकोळ आजारांचे आगाऊ निदान करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI Disease Diagnosis) वापर करून काही रुग्णालयांच्या सहाय्याने नवे मॉडेल तयार करण्याची योजना हाती घेतली आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात 'एआय' मॉडेल मधील डिजिटल ट्विन प्रकाराचा फायदा साथरोग आजारांची आगाऊ माहिती मिळण्यासाठी होणार आहे. तसेच विशिष्ट काळात उद्भवणाऱ्या आजारांचा विभागवार डेटा गोळा करून त्याचे विश्लेषण केल्यामुळे त्याबाबतही वेळीच माहिती उपलब्ध होऊन आजारांना अटकाव करण्यासाठी तयारी करता येणार आहे. विशेषतः महिलांमधील स्तनांचा तसेच गर्भाशयाचा कर्करोग यांसारख्या दुर्धर आजारांसाठीही हे 'एआय मॉडेल' उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुंबई विद्यापीठाच्या संशोधन व विकास विभागाने व्यक्त केला आहे.
'प्रधानमंत्री उषा योजने' अंतर्गत हा प्रकल्प मुंबई विद्यापीठात राबविण्यात येत असून प्रामुख्याने आरोग्य, कृषी व शिक्षण विषयात एआय मॉडेल विकसित करण्याचे काम केले जाणार आहे. कर्करोग व क्षयरोग तसेच विभागवार आजारांचा विचार करून कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक मॉडेल तयार केली जाणार आहेत. यासाठी आजारांचे नमुने व सखोल माहिती गोळा करावी लागणार आहे. यासाठी मुंबईतील नामवंत रुग्णालयांच्या समन्वयातून काम सुरू केले जाणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीमुळे अनेक आजारांचे वेळीच निदान होणे शक्य होत आहे. कर्करोगाचे वेळीच निदान झाल्यास त्याला मोठ्या प्रमाणात अटकाव करणे शक्य होईल. तसेच काही विभागवार किंवा काही भागांमध्ये मोठ्या संख्येने आढळून येणाऱ्या आजारांचा अभ्यास केल्यास कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने त्याचे वेळीच निदान होऊन उपचारास मदत करण्यासाठी विद्यापीठाच्या संशोधन विभागाने पुढाकार घेतला आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने अनेक गंभीर आजारांचे निदान लवकर होणे शक्य आहे. विशेषतः कर्करोगासारख्या आजारांचे निदान लवकर झाल्यास त्याला मोठ्या प्रमाणात अटकाव करता येईल. अलीकडे लंडनच्या इम्पिरियल कॉलेजने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने ट्रायकॉर्डर नावाची आज्ञावली तयार केली. त्यामुळे अगदी ग्रामीण भागातील डॉक्टरांना स्टेथोस्कोपच्या मदतीने हृदयाची स्थिती जाणून घेणे शक्य झाले आहे. यामध्ये हृदयाचे ठोके, रक्ताभिसरण, हृदयाकडून होणाऱ्या रक्तपुरवठ्याची माहिती याची अचूक नोंद करता येऊ लागली आहे. त्यामुळे हृदयविकारावर आधीच उपचार होऊ शकतात.