बदलापूरमधील शाळेत चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा आज पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे. अक्षय शिंदे याने पोलिसांचीच बंदूक खेचून त्यांच्यावर गोळीबार केल्याने पोलिसांनी स्वत:च्या बचावासाठी गोळीबार केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणाबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी एक ट्विट करत हे सर्व प्रकरण संशय़ास्पद असल्याचे म्हटले आहे.
”बदलापूरच्या नराधमाने जे अमानुष कृत्य केलं होतं, त्याबद्दल त्याला कायद्याच्या चौकटीत राहून फाशीच व्हायला हवी होती. पण आज संध्याकाळी जे घडलं ते हलगर्जीपणाचं आणि संशयास्पद आहे. या घटनेचा वापर करुन स्वतःची पाठ थोपटून घेणारे, राजकीय स्वार्थ साधू पाहणारे महाभागही आता पुढे येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा राजकीय वापर करून स्वतःची प्रतिमा स्वच्छ करु पाहणारेही दिसू लागतील. पण या शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत? त्यांना वाचवण्याचा प्रयत्न कोण करतंय? आजच्या घटनेचा आणि या लपवालपवीचा काही संबंध आहे का? याची निःपक्षपाती चौकशी व्हायला हवी’, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.