चिखली (Buldana):- सोयाबीन –कापसाला भाव नाही, कर्जमाफी पीक विमा, सिंचन अनुदानाचे पैसे मिळाले नाही. शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज नाही, महागाई प्रचंड वाढत असून दररोज ६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या (Suicide)होत आहे. अशातच शेतकऱ्यांच्या मागण्यांचे रक्ताचे निवेदन पोलीस प्रशसानाने फाडणे म्हणजे हे सरकार शेतकऱ्यांप्रती संवेदनशील नाही. या निष्ठूर सरकरारच्या विरोधात बेमुदत अन्नत्याग आंदोलन (Food Abstinence Movement)सावरगाव डुकरे येथे २३ सप्टेंबरपासून आम्ही शेतकऱ्यांनी सुरु केले. आमच्या आंदोलनाला विरोध म्हणून विरोधकांनी सावरगाव डुकरे येथेच आंदोलन सुरु केल्याने गावातील सामाजिक सलोखा बिघडू नये यासाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन स्थगित केले असून गावा- गावात जावून १ लाख रक्तांच्या सह्यांचे निवेदन राज्यपालांना देणार असल्याचे रणशिंग जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी फुंकले आहे.
१ लाख रक्तांच्या सह्यांचे निवेदन राज्यपालांना देणार
बुधवार २५ सप्टेंबर रोजी माजी मंत्री तथा महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे(Congress Committee) माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते राहुल भाऊ बोंद्रे व शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन सोडण्यात आले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे बोलत होते. जगाचा पोशिंदा जीवन संपवण्याच्या विंवचनेत असतांना सरकार त्यांच्या मागण्यांवर चर्चा करत नाही. शेतकऱ्यांनाच लुटायचे अन् त्यांना लंगोटी दान करायची असे महायुती सरकारचे धोरण असल्याचेही राहुल बोंद्रे यांनी सांगितले. अन्नत्याग आंदोलन सोपी गोष्ट नाही, शेतकऱ्यांप्रती राहुल बोंद्रे यांच्या मनात आस्था आणि तळमळ असल्यामुळे ते करु शकले, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ते जेलमध्ये जायला भीत नसल्याचे काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर म्हणाले.