Published on
:
12 Oct 2024, 9:06 am
Updated on
:
12 Oct 2024, 9:06 am
छत्रपती संभाजीनगर: श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून दृष्ट शक्तींचा विनाश केला. त्यानंतर कालांतराने समाजात पुन्हा दृष्ट आणि अदृश्य शक्तींचा वावर वाढला. या शक्तींवर विजय मिळविण्यासाठी अध्यात्मिक वळविण्यासाठी समाजमन गोष्टींकडे प्रत्येक विजयादशमीला बालाजी रथ ओढण्याची परंपरा गेल्या चारशे वर्षांपासून सुरू आहे. अशी माहिती मंदिराचे पुजारी राजेंद्र पुजारी यांनी दिली.
शारदीय महोत्सवानिमित्त कर्णपुरा यात्रेत लाखोंच्या संख्येने भाविक कर्णिकामातेच्या दर्शनासाठी येतात. याच परिसरात चारशे वर्षांपूर्वीचे बालाजी मंदिर आहे. या मंदिरात नवरात्रीच्या काळात पूज- अर्चा, रुद्राभिषेक नित्यनियमाने केला जातो. रामायण काळात श्रीरामांनी रावणाचा पराभव करून दृष्ट शक्तींवर विजय मिळवला. कलयुगातही दृष्ट शक्तींवर विजय मिळवावा. समाजाला आध्यात्माची ओढ लागावी, हे उद्दिष्ट समोर ठेवून गेल्या चारशे वर्षांपासून विजयादशमीला बालाजी रथ ओढला जातो. सायंकाळी सहा वाजता मान्यवरांच्या हस्ते रथाची आरती केल्यानंतर तो ओढत सीमोल्लंघनाला सुरुवात होते. हा रथ पंचवटी चौकापर्यंत आणला जातो.
मालखरे परिवार रथाची आरती करतो
या पंचवटी चौकात परंपरेनुसार मालखरे परिवार रथाची आरती करतो. पुढे पंचमुखी हनुमान येथे वैष्णव परिवार, परदेशीपुर्यात काकस परिवार, बैरागी वाड्यातील वैष्णव परिवार आरती करतो. त्यानंतर हा रथ पुन्हा बालाजी मंदिराकडे आणला जातो. त्यानंतर मुख्य व उत्सवमूर्तीची भेट घडवून आणली जाते. रथयात्रेची तयारी अध्यक्ष राजेंद्र पुजारी, गोपाळकृष्ण पुजारी आणि अनुप पुजारी करत आहेत.
नित्यनियमाने होतो रुद्राभिषेक
नवरात्रौत्सवत पहाटे नित्यनियमाने बालाजी मंदिरात रुद्राभिषेक केला जातो. नऊ दिवस सुरू असलेल्या या रुद्राभिषेकाची विजयादशमीला समाप्ती होते. पहाटे साडेतीन वाजेपासून मंदिरात दर्शनासाठी गर्दी होते. त्यानंतर थेट रात्री एक वाजता मंदिराची साफसफाई केली जाते. यंदा प्रदीप ढंगारे हे स्वयंस्फूर्तीने मंदिर स्वच्छतेचे काम करत असल्याचेही पुजारींनी सांगितले.