आईने दुसरे लग्न केल्याच्या नैराश्यातुन अल्पवयीन मुलाने संपविले जीवनFile
Published on
:
10 Oct 2024, 5:05 am
Updated on
:
10 Oct 2024, 5:05 am
मिरारोड : पुढारी वृत्तसेवा
आईने दुसरे लग्न केल्याच्या नैराश्यातुन आठ वर्षीय मुलाने मंगळवारी विहिरीत उडी मारून जीवन संंपविले. महिलेच्या पहिल्या नवर्याकडून असलेल्या आठ वर्षीय मुलाला उत्तन येथील अनाथ आश्रमात ठेवण्यात आले होते. तो चिमुकला आईबरोबर जाण्याचे बोलत होता. त्याला आश्रमात ठेवल्याच्या नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
उत्तन येथील आश्रमात ठेवलेल्या 8 वर्षीय मुलाला गेल्या महिन्यात आई भेटायला आली होती. त्यावेळी मला घेऊन चल आई, मला इथे नाही राहायचं अस तो आई आणि संस्थेच्या लोकांना सांगत होता. परंतु आईने दुसरे लग्न केल्यामुळे ती नालासोपारा येथे राहत असल्याने तिने मुलाला सोबत ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे आई त्याला घेऊन जात नाही म्हणून रात्री सर्व झोपी गेल्यानंतर बाजूला असलेल्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. काही महिन्यांपूर्वीच अल्पवयीनला एका सामाजिक संस्थेत दाखल केले होते. तो इतर 21 लहान मुलांसोबत संस्थेत राहायला होता. मंगळवारी सकाळी उठल्यानंतर तो कुठेच दिसून आला नाही. त्यावेळी त्याचा शोध घेतला असता तो विहिरीत पडलेला असल्याचे आढळून आले. तेव्हा तिथल्या लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली व त्यानंतर पोलीस व अग्निशमन विभाग हे घटनास्थळी दाखल होत त्याचा मृतदेह बाहेर काढला. या घटनेची माहिती मिळताच भाईंदर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त दिपाली खन्ना व उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाराम करांडे यांनी घटनास्थळाला भेट देत त्या चिमुरड्याचा मृतदेह ताब्यात घेतला. या अकस्मात मृत्यूच्या नोंदीचा तपास स.पो. निरीक्षक सपन बिश्वास हे करत आहेत.