मविआचा जागावाटपाचा तिढा सुटता सुटेना:पण काँग्रेसमध्ये आतापासूनच मुख्यमंत्रिपदासाठी लॉबिंग, नेत्यांमध्ये गुप्त बैठकांचे सत्र सुरू असल्याची माहिती

2 hours ago 1
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही. पण आतापासूनच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी प्रचंड लॉबिंग सुरू झाल्याची माहिती पुढे आली आहे. यासंबंधी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांत गुप्त बैठका होत असल्याचीही माहिती आहे. या घटनाक्रमामुळे पक्षाला विधानसभा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कामगिरीत कमालीची सुधारणा झाली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत केवळ 1 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक 13 जागा मिळाल्या. त्यात एका अपक्षानेही काँग्रेसला पाठिंबा दिला. यामुळे काँग्रेस नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळेच काँग्रेस विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागावाटपात अधिकाधिक जागा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. लोकसभा निवडणुकीतील यशामुळे विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीलाच यश मिळेल असा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये आतापासूनच मुख्यमंत्रीपदापासून इतर महत्त्वाच्या पदासाठी लॉबिंग सुरू झाल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. प्रमुख पदासांठी गुप्त बैठकांचे सत्र सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसमधील अनेक नेते मुख्यमंत्रीपदासाठी आतूर झालेत. काही प्रमुख नेत्यांनी या प्रकरणी आपला प्रामुख्याने विचार व्हावा यासाठी पक्षांतर्गत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यासाठी ते संभाव्य उमेदवारांपर्यंतही पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. या समर्थनार्थ काहींना मंत्रिपदे, महामंडळे व इतर समित्यांवर नियुक्ती करण्याचा प्रस्ताव दिला जात आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अजून ठरला नसताना काँग्रेसमध्ये या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे दिल्लीतील काँग्रेस नेतृत्वाला या घटनाक्रमाची जाणीव करून देण्यात आली आहे. काँग्रेसमधील या घडामोडींवर वेळीच उपाययोजना करण्यात आली नाही, तर आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला फटका बसेल असा इशारा या प्रकरणी देण्यात आला आहे. काँग्रेसने गटबाजीचा दावा फेटाळला दुसरीकडे, मुख्यमंत्रीपदावरून आपल्या पक्षात कोणताही अंतर्गत संघर्ष नसल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. मुख्यमंत्रीपदावरून आमच्या पक्षात कोणतीही अंतर्गत लढाई नाही. इच्छुक उमेदवार आपापल्या नेत्यांना भेटून उमेदवारीची मागणी करत आहेत. त्यावर नेतेमंडळीही सामंजस्याने निर्णय घेत आहेत. या प्रकरणी कोणताही वाद नाही. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडणुकीनंतरच घेतला जाईल. सध्या महायुतीचे सरकार सत्तेतून बेदखल करण्यास आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असे काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी या प्रकरणी भाष्य करताना म्हटले आहे. दरम्यान, काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या संभाव्य उमेदवारांच्या नावांची यादी तयार केली आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते पुढील काही दिवसांत या उमेदवारांच्या मुलाखती घेतली. त्यानंतर ही यादी अंतिम केली जाईल. निवडणूक जवळ येत असताना काँग्रेसमधील विविध गट प्रमुख मतदारसंघावर आपला वरचष्मा सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे काँग्रेस नेतृत्वापुढे पक्ष एकसंध ठेवण्याचे मोठे आव्हान उभे टाकले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article