Uddhav Thackeray File Photo
Published on
:
04 Oct 2024, 3:22 am
Updated on
:
04 Oct 2024, 3:22 am
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे, पण अजूनही न्याय मिळत नाही आहे. त्यामुळे आम्ही थेट जनतेच्या न्यायालयात दाद मागणार आहोत. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून आम्ही न्यायमंदिराची दारे ठोठावत आहोत.
आता हात दुखायला लागले आहेत. त्यामुळे तू तरी दार उघड, असे साकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जगदंबेला घातले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आगामी विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी केली.
असून घटस्थापनेच्या मुहूर्तावर गुरुवारी शिवसेना भवन येथे पक्षाच्या मशाल चिन्हाचा उल्लेख असलेले नव्या प्रचारगीताचे अनावरण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी संपूर्ण देशावर अराजक आले होते.
तेव्हा संत एकनाथ यांनी 'बाई दार उघड..' अशी आरोळी दिली होती. आता एकनाथांच्या नावाने तोतयागिरी करणारे खूप दिसत आहेत, असा खोचक टोला ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावत जोरदार टीकास्त्र सोडले.
याच तोतयागिरीचा नायनाट करण्यासाठी 'असुरांचा संहार कराया, मशाल हाती दे.., सत्वर भूवरी ये गं अंबे..., सत्वर भूवरी ये... 'हे गीत नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अराजकीय गीत आई जगदंबेला सादर केल्याचे ठाकरे म्हणाले.