माळेगाव साखर कारखान्याच्या सत्ताधारी संचालक मंडळाने 240 केएलपीडी प्रकल्प पुढील निर्णय होईपर्यंत रद्द करण्याचे ठरविले असून, याबाबत प्रसिद्ध झालेली निविदा देखील रद्द केली आहे. यासाठी विशेष सर्वसाधारण सभा घेण्याचे ठरल्याचा खुलासा कारखान्याचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप व उपाध्यक्ष तानाजीराव देवकाते यांनी केला आहे. या वेळी मदननाना देवकाते, नितीन सातव, अनिल तावरे, निशिकांत निकम उपस्थित होते.
दुसरीकडे संबंधित खुलासा आम्हाला देखील मान्य असून, याबाबत विशेष सर्वसाधारण सभेमध्ये सभासद जो निर्णय घेतील तो सर्वांनी मान्य करावा, अशी भूमिका विरोधी गटाचे संचालक चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांनी घेतली आहे. या वेळी जी. बी. गावडे, शशिकांत कोकरे, राजेश देवकाते, रमेश गोफणे, रोहित जगताप, सत्यजित जगताप, प्रकाश सोरटे, दादा झांबरे, अॅड. श्याम कोकरे, दादा पाटील तावरे, संजय तावरे, चिंतामणी नवले आदी उपस्थित होते. त्यामुळे माळेगाव साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अनुषंगाने कळीचा मुद्दा ठरलेल्या इथेनॉल प्रकल्पाबाबत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये सामंजस्य झाल्याचे चित्र आहे.
मागील अनेक दिवसांपासून माळेगाव साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्प विस्तारीकरणाचा मुद्दा गाजत आहे. त्या अनुषंगाने 240 केएलपीडी प्रकल्प करावा, अशी भूमिका सत्ताधारी संचालक मंडळाने घेतली होती, तर 500 केएलपीडीचा इथेनॉल प्रकल्प कसा फायद्याचा आहे, याबाबत विरोधकांनी भूमिका मांडली होती. दरम्यानच्या कालावधीत कारखान्याच्या विशेष सर्वसाधारण सभेच्या अनुषंगाने कारखाना कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावांमध्ये जाऊन सत्ताधारी आणि विरोधक कोणता प्रकल्प फायद्याचा आहे, याबाबत आपापल्या परीने सभासदांमध्ये जनजागृती करत होते.
दरम्यान, केंद्र शासनाचे इथेनॉलबाबत असलेले अनिश्चित धोरण तसेच या प्रकल्पामुळे निर्माण होणारे प्रदूषण व त्यामुळे कार्यक्षेत्रातील निरा नदीकाठच्या गावातील ऊस उत्पादक शेतकरी सभासदांच्या जमिनी नापीक होण्याचे वाढलेले प्रमाण हे मुद्दे पुढे करत सत्ताधारी संचालक मंडळाने हा प्रकल्प स्थगित ठेवला होता. परंतु, याबाबत सभासदांमध्ये संभ—मावस्था दिसत असल्याने हा खुलासा सत्ताधारी संचालक मंडळाने पत्रकार परिषदेमध्ये केला. याबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये विरोधकांनी देखील आपली भूमिका मांडली. त्यामुळे माळेगाव कारखान्याच्या सोमवारी (दि. 30) होणार्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सत्ताधारी व विरोधक यांनी घेतलेल्या इथेनॉल प्रकल्पाच्या भूमिकेबाबत सभासद काय मत व्यक्त करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.