एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्र नासवला:देवेंद्र फडणवीस यांनी माणसांत माणूस आणि जातीत जात ठेवली नाही, सुषमा अंधारे यांचा घणाघात

6 days ago 4
शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शनिवारी दसरा मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र नासवण्याचे काम केले असून, देवेंद्र फडणवीस यांनी माणसांत माणूस आणि जातीत जात ठेवली नाही, असे त्या म्हणाल्यात. सुषमा अंधारे आपल्या भाषणात म्हणाल्या, आज सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक महत्त्वाचा मेळावा झाला. त्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी समाजील द्वेष संपवण्याची भाषा केली. त्यांनी देश बलशाली करण्यावर भर दिला. दुर्बल घटकांना सोबत घेण्याची सूचना केली. पण त्यांना खरेच द्वेषबुद्धी संपवण्याचा सल्ला द्यायचा असेल तर त्यांनी तो सर्वप्रथम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावा. कारण, फडणवीस यांनी या राज्यात माणसांत माणूस ठेवला नाही, जातीत जात ठेवली नाही. त्यांनी राज्यात द्वेषाचे राजकारण पसरवले. यासाठी त्यांनी कोकणातील बाजारातून रद्दबातल झालेली चिल्लर पाळली आहे. त्यांनी ही चाराणे - बाराण्याची चिल्लर बाजारात आणली. त्यामुळे सरसंघचालकांनी देवेंद्र फडणवीस यांचे कान टोचून त्यांना आम्हाला हा महाराष्ट्र शांत हवा असल्याचे ठणकावून सांगावे. गावगाड्याची विण उसवण्याचा प्रयत्न सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, कोकणातील ही चिल्लर अगोदर हिंदू - मुस्लिम करत होती. पण या दोन्ही समाजांनी कमालीचा संयम दाखवून त्यांच्या विद्वेषाला व लव्ह जिहादला कवडीची किंमत दिली नाही. मग भाजपने दुसरा खेळ सुरू केला. हिंदू-मुस्लिम कार्ड चालत नसल्यामुळे त्यांनी आता मराठा - ओबीसी कार्ड खेळण्यास सुरुवात केली आहे. याद्वारे ते राज्यातील गावगाड्याची विण उसवण्याचा प्रयत्न करत आहेत. जनतेने यावर विचार करावा. कालपर्यंत आपण सर्वजण एकत्र राहत होतो. पण आज या लोकांनी आपल्यात द्वेष पसरवला. आज तेच शिंदे व फडणवीस आम्हाला शहाणपण शिकवत आहेत. ते असे का करत आहेत? लोकांनी महागाई, बेरोजगारी आदी प्रश्न विचारू नयेत म्हणून त्यांनी हे राजकारण सुरू केले आहे. फडणवीसांनी बंगला विकून बहिणींना पैसे दिले काय? सुषमा अंधारे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस लाडकी बहीण योजना विरोधकांच्या डोळ्यांत खूपत असल्याचा आरोप करतात. पण ही योजना आमच्या डोळ्यांत खुपण्याचे काहीच कारण नाही. फडणवीसांनी या योजनेंतर्गत दिले जाणारे 1500 रुपये नागपूरचा बंगला विकून दिले नाहीत. ते पैसे जनतेचेच आहेत. शिंदे सरकारने ते फक्त महिलांना देण्याचे काम केले. सरकार याकामी केवळ पोस्टमनचे काम करत आहे. त्यामुळे त्यांनी या योजनेचे श्रेय घेण्याचे काम करू नये. महायुती सरकारच्या नेत्यांना भाऊ - बहिणीच्या नात्यांची समज नाही. त्यांच्या बोलघेवड्या आमदारांनाही त्याची जाण नाही. भाऊ बहिणीला पैसे देतो तेव्हा त्याचे बॅनर लावत नाही. हे लोक आपली बहीण व तिच्या गरिबीची थट्टा करत आहेत, असे सुषमा अंधारे म्हणाल्या. फडणवीस हे फेक नरेटिव्हचे महानिर्मिती केंद्र - अंधारे देवेंद्र फडणवीस हे फेक नरेटिव्हचे महानिर्मिती केंद्र आहेत. काँग्रेसने आरक्षणाची मर्यादा वाढवली. तेव्हा 1960 साली भाजपचे अस्तित्वही नव्हते. त्यानंतर 1970 मध्ये पुन्हा एकदा राजकीय आरक्षणात वाढ करण्यात आली. त्यानंतरही फडणवीस भाजपने आरक्षण वाढवल्याचा दावा करतात. त्यामुळे ते फेक नरेटिव्हचे महानिर्मिती केंद्र असल्याचे स्पष्ट होते, असेही सुषमा अंधारे यावेळी फडणवीसांवर घणाघात करताना म्हणाल्या. एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्र नासवला - सुषमा अंधारे सुषमा अंधारे म्हणाल्या, एकनाथ शिंदे यांना राज्यातील एकही आंदोलन सांभाळता आले नाही. त्यांनी राज्यात दंगली घडवून आणल्या. त्यांनी महाराष्ट्र नासवण्याचे काम केले. आज तेच आम्हाला शहाणपण शिकवत आहेत. 10 वर्षांपूर्वी इंदू मिलचे भूमिपूजन केले. पण त्याची एकही वीट उभी केली नाही. शिवरायांचे स्मारकही अद्याप उभे राहिले नाही.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article