Published on
:
24 Sep 2024, 4:09 pm
Updated on
:
24 Sep 2024, 4:09 pm
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा-
कर्नाटकमधील मुडा गैरव्यवहाराप्रकरणी उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची याचिका फेटाळली. त्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपने केली. त्यासोबतच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही पत्रकार परिषद घेऊन या विषयावर पक्षाची भूमिका स्पष्ट करावी, अशीही मागणी भाजपने केली.
भाजप मुख्यालयात पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. चंद्रशेखर म्हणाले की, उच्च न्यायालयाने मुडा गैरव्यवहाराप्रकरणी मुख्यमंत्र्यांची याचिका फेटाळली आहे, यावरून हे स्पष्ट होते की काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकारने गैरव्यवहाराची सर्वोच्च पातळी गाठली आहे. राहुल गांधींनी आता परदेशात भारताची बदनामी करणे थांबवावे आणि काँग्रेसचे नेते गैरव्यवहार का करतात, यावर विचार करावा असा सल्लाही दिला.
राजीव चंद्रशेखर म्हणाले की, एका मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करणे हे लाजिरवाणे आहे. तसेच मुख्यमंत्र्यांसह कर्नाटक काँग्रेस मधील एकही नेता निर्दोष नाही, असेही ते म्हणाले. आजवरच्या काँग्रेस सरकारांनी भ्रष्टाचाराला मदत करण्याची, प्रोत्साहन देण्याची संस्कृती विकसित केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या पक्षाच्या याच परंपरेला पुढे नेत आहेत, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.