किल्ले विशाळगडाचा मुद्दा पुन्हा तापणार:चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा केल्यानंतर कलेक्टरचे अतिक्रमणावर पुन्हा हातोडा मारण्याचे संकेत

1 hour ago 2
राज्याचे महसूल मंत्री तथा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतच्या चर्चेनंतर कोल्हापूरच्या जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा किल्ले विशाळगडावरील वादग्रस्त अतिक्रमणावर हातोडा मारण्याचे संकेत दिलेत. त्यामुळे आगामी राज्य विधिमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर पुन्हा एकदा हा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. गतवर्षी 13 जुलै रोजी किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यावरून मोठा हिंसाचार झाला होता. त्यानंतर कोल्हापूर जिल्हा पोलिसांकडून या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. ही संचारबंदी 5 महिन्यांनी मागे घेण्यात आली. त्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा एकदा हा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. माजी आमदार नितीन शिंदे यांनी नुकतीच या प्रकरणी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी विशाळगड अतिक्रमणमुक्त करण्यासंबंधीचे निवेदन दिले होते. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. त्यानंतर जिल्हाधिकारी येडगे यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या कारवाईला पुन्हा एकदा सुरुवात करण्याचे सूतोवाच केले आहे. काय म्हणाले जिल्हाधिकारी? 'विशाळगडावरील 150 पैकी 90 अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. उर्वरित 60 अतिक्रमणे अद्याप शिल्लक आहेत. काही अतिक्रमणधारक हायकोर्टात गेल्यामुळे पावसाळ्यात झालेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईला स्थगिती देण्यात आली होती. आता न्यायालयाच्या निर्देशांनुसार पुरातत्व विभागाने अतिक्रमणावर सुनावणी घेऊन आपला निर्णय द्यायचा आहे. त्यांचा जो काही निर्णय येईल त्यानुसार पुन्हा कारवाईला सुरुवात केली जाईल,' असे जिल्हाधिकारी म्हणालेत. त्यांच्या या विधानामुळे पुढील काही दिवसांत कोणत्याही क्षणी ही अतिक्रमण हटाव मोहीम सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे गतवर्षी या प्रकरणी सत्ताधारी व विरोधकांत बरीच मोठी राजकीय चिखलफेक झाली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने विशाळगडावरील 150 हून अधिक अतिक्रमणांवर हातोडा मारला होता. पण काही अतिक्रमण धारकांनी या प्रकरणी न्यायालयात धाव घेतल्यानंतर त्या कारवाईला स्थगिती आली होती. पण आता पुन्हा एकदा येथील नागरिकांच्या मानगुटीवर या कारवाईचे भूत उभे राहण्याची शक्यता आहे. विशाळगडावरील अतिक्रमणाचा वाद नेमका काय? बाजीप्रभू देशपांडे व त्यांच्या मावळ्यांनी जीवाची बाजी लावून पावनखिंड लढवली. त्याच पावनखिंडीपासून साधारण 23 किलोमीटरवर असलेल्या विशाळगडावर शिवाजीराजे सुखरुप पोहोचले. शिवकाळात विशाळगड अत्यंत महत्वाचा होता. कोकण ते कोल्हापूरपर्यंतचा तत्कालीन व्यापार मार्गावर टेहळणी करण्यासाठी विशाळगडाचा वापर व्हायचा. विशाळगडावरून अणुस्कुरा घाट, पुढे आंबा घाट तथा त्या मार्गावरुन होणाऱ्या सर्व हालचालींवर बारीक लक्ष ठेवता यायचे. गूगल अर्थवरुन विशाळगडाचे सध्याचे चित्र पाहिले तर येथे दिसणारी सर्वच बांधकाम अनधिकृत नाहीत. सद्यस्थितीत इथे मारुती मंदिर, अमृतेश्वर, भगवंतेश्वर, विठ्ठल-रुख्मिनी, गणेश, विठलाई, रामेश्वर, नरसोबा, वेताळ, वाघजाई, खोकलाई देवी आणि हजरत मलिक रेहान दर्गा आहे. हा दर्गा 17 व्या शतकातील आहे. या सर्व वास्तू राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित आहेत. इथल्या मलिक रेहान दर्ग्यात मुस्लिमांसोबत हिंदूही नवस बोलतात. कालांतराने येथे येणाऱ्यांची संख्या वाढली त्यातून किल्ल्यांवर पर्यटकांसाठी दुकाने, घरांचे अनधिकृत बांधकाम झाली. काही मंदिरांबाहेरही अशीच दुकाने उभी राहिली. घरे, पत्राचा शेड, दुकाने असे सर्व मिळून साधारण 156 अनधिकृत बांधकामे सध्या इथे आहेत. यात मुस्लिमांसोबत काही हिंदूचाही समावेश आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, इथली बहुतांश अनधिकृत बांधकामे ही 15 वर्षांपूर्वीची आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article