चार महिन्यांपासून 12 हजार विद्यार्थी गणवेशाच्या प्रतीक्षेत:पालकांमधून उमटतोय नाराजीचा सूर; प्रशासनाची दिरंगाई‎

2 hours ago 1
खासगी शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना चांगला गणवेश मिळावा, यासाठी शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना दोन मोफत गणवेश देण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. परंतु, शाळा सुरू होऊन चार महिन्यांचा कालावधी उलटला तरीही तालुक्यातील १२ हजार ६८७ विद्यार्थ्यांपैकी एकही विद्यार्थ्याला अद्यापही गणवेशाचे वितरण करण्यात आलेले नाही. या गंभीर विषयाकडे संबंधित विभागाचे साफ दुर्लक्ष दिसून येत आहे. त्यामुळे पालकांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे. दुसरीकडे गणवेश विद्यार्थी गणवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या १२० जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. त्यामध्ये १२ हजार ६८७ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या सर्व घटकातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी बुलढाणा जिल्ह्यात सर्वशिक्षा अभियान राबविले जात आहे. परंतु, या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुविधा पुरविल्या जात नसल्याने, तसेच खासगी शाळांचा थाटबाट पाहून पालकांसह विद्यार्थ्यांचा कल खासगी शाळांकडे वाढत आहे. परिणामी, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची कमतरता दिसून येत आहे. त्यामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विविध योजनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये मोफत पाठ्यपुस्तके, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी टेबल बेंच यासह मोफत गणवेश वाटप अशा विविध प्रकारच्या योजना राबविल्या जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शासनाच्या वतीने केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना दोन मोफत गणवेश वितरीत करण्यात येत आहे. या मोफत गणवेश वाटपासाठी शासनाच्या वतीने टेंडर पद्धत अवलंबविण्यात आली. त्यासाठी कापड पुरविण्याचा टेंडर देण्यात आले आहे. तर एक नियमित गणवेश संच शिलाई करून देण्याची जबाबदारी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने स्थानिक महिला बचत गटामार्फत शिलाई करून पुरविण्यात येणार आहे, असे पत्र राज्य प्रकल्प समन्वयक यांनी काढले आहे, अशी माहिती पंचायत समितीतील सर्वशिक्षा अभियान विभागातून देण्यात आली. मात्र, शाळा सुरू होऊन चार महिन्याचा कालावधी झाला तरीही तालुक्यातील १२ हजार ६८७ विद्यार्थ्यांपैकी एकही विद्यार्थ्याला अद्यापगणवेशाचे वितरण करण्यात आलेला नाही. यामुळे पालकांमधूनही नाराजीचा सूर उमटत आहे. तसेच शिक्षकांना पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. तरी लवकर विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालक करीत आहे. लवकरच होईल गणवेशाचे वाटप ^महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सदस्यांशी विद्यार्थ्यांच्या गणवेशासंदर्भात चर्चा केली आहे. पुढील आठ दिवसांत तालुक्यातील सर्व शाळांवर गणवेश उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. गणवेश मिळताच लवकरात लवकर विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात येईल. - मनोहर धंदर, गटशिक्षणाधिकारी, पं.स. मोताळा. लवकरात लवकर गणवेशाचे वाटप करावे ^ इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत दोन गणवेश वितरीत करण्यात येतात. अद्यापही विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केलेले नाही. वास्तविक पाहता शाळा सुरू झाल्यावर पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप होणे अपेक्षित आहे. या गंभीर विषयाकडे संबंधितांनी लक्ष देऊन लवकरात लवकर गणवेशाचे वाटप करण्यात यावे. - शे. समीर, पालक मोताळा.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article