आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जोरदार खलबतं सुरु आहेत. महाविकास आघाडीचं जागावाटप काय असावं? या विषयावर तीनही पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये मॅरेथॉन बैठका पार पडत आहेत. या बैठकीत जवळपास 80 टक्के जागावाटपावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या बैठकांनंतर जागावाटपावर अंतिम निर्णय हा तीनही पक्षांचे पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. तसेच ज्या जागांवर तिढा आहे, त्या जागांचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाण्याची शक्यता आहे. असं असताना आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हालचालींना वेग आला आहे. निवडणूक आयोगाचं पथक आता महाराष्ट्रात येणार आहे. आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला जागावाटप लवकरात लवकर ठरवणं जास्त गरजेचं असणार आहे. जितक्या लवकर जागावाटपाचा फॉर्म्युला ठरेल तितकं चांगलं असणार आहे. कारण तितका वेळ प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराला निवडणुकीच्या प्रचाराला देता येणार आहे. या दरम्यान, महाविकास आघाडीचं जागावाटपाचं सूत्र नेमकं कधी जाहीर होईल? याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या दोन्ही नेत्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
नाना पटोले काय म्हणाले?
जागावाटपाची चर्चा सुरू आहे. येणाऱ्या 9 – 10 दिवसात चित्र स्पष्ट होईल. महाविकस आघाडीमध्ये कोण किती जागा लढवेल हे महत्वाचे नाही. तर जनतेच्या विरोधात असलेले सरकार सत्तेतून बाहेर काढणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, अशी भूमिका नाना पटोले यांनी मांडली. यावेळी नाना पटोल यांना जागावाटपाचं सूत्र काय ठरलं? याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “काही प्रसारमाध्यमांनी तीनही पक्ष 100-100 जागा लढवेल असे सूत्र सांगितले. जागा 288 जागा असताना हे कसे शक्य आहे?”, असा सवाल नाना पटोले यांनी केला.
जयंत पाटील काय म्हणाले?
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील जागावाटपाबाबत भाष्य केलं आहे. ते जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. “महाविकास आघाडीच्या जागांचे वाटप या दोन-तीन तारखेपर्यंत पूर्ण होईल”, असं जयंत पाटील म्हणाले. यावेळी जयंत पाटील यांनी महायुतीवरही निशाणा साधला. “पाडळसरे धरणाचा प्रश्न आहे. अनियमित वीजपुरवठाची समस्या आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी प्रचंड त्रस्त आहे आणि इथले आमदार म्हणतात आम्ही हजारो कोटी रुपयांची कामे आणली. हजारो कोटी रुपयांची कामे जर तुम्ही आणली तर रस्ते का एवढे खराब?”, असा सवाल जयंत पाटील यांनी केला.
“सामान्य लोकांचे समाधान का झालेलं नाही? या मतदारसंघाचे आमदार दहा दिवसातून एकदाच येतात आणि जळगावला राहतात. त्यांना वाटेल तेव्हा येतात. इथल्या आमदारांच्या विरुद्धचा रोष व्यक्त व्हावा आणि विधानसभेमध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीचा आमदार विजयी व्हावा”, अशी अपेक्षा व्यक्त करतो.