जेव्हा आरशात मी चेहरा पाहिला…; महिमा चौधरीने सांगितली त्या भीषण अपघाताची आठवण

2 hours ago 1

अभिनेत्री महिमा चौधरीने 1997 मध्ये ‘परदेस’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटातून महिमाने तिच्या दमदार अभिनयकौशल्याची चुणूक दाखवली होती. पण दुर्दैवाने 1999 मध्ये ‘दिल क्या करे’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिचा भीषण अपघात झाला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत महिमाने त्या अपघाताच्या कटू आठवणी सांगितल्या आहेत. या अपघातानंतर आपण पुन्हा फिल्म इंडस्ट्रीत काम करू शकणार नाही, असं महिमाला वाटलं होतं. कारण तिच्या चेहऱ्यावरून डॉक्टरांनी तब्बल 67 काचेचे तुकडे काढले होते. हीच घटना आताच्या घडीला घडली असती तर अनेकांनी पाठिंबा दर्शविला असता, पण त्याकाळी इंडस्ट्रीत तेवढे मोकळे विचार कोणीच करत नव्हतं, अशी खंत महिमाने बोलून दाखवली.

‘रेडिओ नशा’ला दिलेल्या मुलाखतीत महिमा म्हणाली, “जेव्हा माझा अपघात झाला होता, तेव्हा मला जाणवलं नव्हतं की माझ्या चेहऱ्यावर इतक्या जखमा असतील. जेव्हा मी बाथरुममध्ये गेले आणि आरशात चेहरा पाहिला, तेव्हा मला समजलं होतं. त्याआधी मी दिग्दर्शक प्रकाश झा यांना सांगत होते की जर गंभीर काही नसेल तर आपण शूटिंग पूर्ववत करू शकतो. कारण डॉक्टरांनी स्कॅन वगैरे केलं होतं. तेव्हा ते म्हणाले, नाही नाही. आपण थांबुयात. आपण सर्वजण बाहेर जाऊयात आणि तारखांविषयी बोलून घेऊयात. पण जेव्हा मी आरशात माझा चेहरा पाहिला, तेव्हा मला जाणवलं की माझा पूर्ण चेहराच खराब झालाय.”

हे सुद्धा वाचा

“जेव्हा अजय देवगण आणि प्रकाश झा परतले, तेव्हा सर्वांत आधी मी त्यांना विनंती केली की कृपया कोणालाच ही गोष्ट सांगू नका. माझा अपघात झालाय आणि त्यात माझा चेहरा इतका खराब झालाय, हे कोणाला कळू देऊ नका. मला किमान माझं करिअर वाचवण्यासाठी प्रयत्न करू द्या. सुदैवाने प्रॉडक्शन टीमपैकी कोणीच याबद्दल कोणाला सांगितलं नाही. वीस वर्षांनंतर जेव्हा मी लोकांना याविषयी सांगितलं, तेव्हा सर्वांना अपघाताविषयी समजलं. हे कौतुकास्पद आहे. मी सेटवर जायचे आणि प्रत्येकजण मला पाहू शकत होतं”, असं ती पुढे म्हणाली.

अपघातानंतर एका मॅगझिन फोटोग्राफरने महिमाचा गुपचूप फोटो क्लिक करून तो प्रकाशित केला होता. त्यात ‘डाग असलेला चेहरा’ असा उल्लेख करण्यात आला होता. याव्यतिरिक्त कधीच कोणी काही म्हटलं नाही, असंही महिमाने सांगितलंय. अपघातापूर्वी महिमाने दिवंगत दिग्दर्शक सतीश कौशिक आणि अनिल कपूर यांच्यासोबत एक चित्रपट साइन केला होता. मात्र अपघातानंतर तिने स्वत:हून त्यातून माघार घेतली. जेव्हा अनिल कपूर तिच्या घरी गेले, तेव्हा महिमाने पायाला दुखापत झाल्याचं खोटं सांगितलं होतं. जेणेकरून चेहऱ्याबद्दल तिला काही सांगावं लागू नये. “तो काळ खूप कठीण होता कारण अत्यंत कमी वयात मी ते सगळं सहन केलं होतं”, अशा शब्दांत महिमाने दु:ख व्यक्त केलं.

“अजय मला म्हणायचा की सर्जरीनंतर सर्वकाही ठीक होईल, पण मला त्यावर विश्वास नव्हता. मी दुसऱ्या करिअरचाही विचार करत होते. आजही माझा एक डोळा दुसऱ्या डोळ्यापेक्षा आकाराने लहान आहे. करिअरच्या त्या सुरुवातीच्या काळात हे सर्व सहन करणं खूप तणावपूर्ण होतं. त्यानंतर मी कधीच थेट कॅमेरासमोर गेले नाही. मी नेहमीच कॅमेरासमोर चेहऱ्याची एक बाजूच दाखवायची”, असं तिने सांगितलं.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article