Published on
:
05 Feb 2025, 4:27 am
Updated on
:
05 Feb 2025, 4:27 am
हिंगोली : पुढारी वृत्तसेवा
तेहराण येथे कंपनीच्या पाहणीसाठी गेलेला वसमतचा बेपत्ता अभियंता योगेश पांचाळ अखेर तीन महिन्यानंतर आज (बुधवार) पहाटे मुंबई विमानतळावर उतरला. त्याला पाहताच कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते. यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी शासनाचे तसेच लोकप्रतिनिधींचे आभारही मानले.
वसमतचा अभियंता योगेश पांचाळ यांनी श्रीयोग एक्सपोर्ट नावाच्या कंपनीची नोंदणी केली होती. या कंपनीच्या विस्तारासाठी त्यांनी दिल्ली, मुंबई येथील काही जणांसोबत संपर्कही साधला होता. त्यानंतर त्यांना अशाच प्रकारची कंपनी तेहराण (इराण) येथे असून त्या ठिकाणी पाहणी करून येण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानुसार 4 डिसेंबर 2024 रोजी योगेश तेहराण येथे पोहोचले होते. त्या ठिकाणी एका हॉटेलमध्ये ते थांबले होते. त्यानंतर 7 डिसेंबरपासून त्यांचा अचानक संपर्क तुटला. यामुळे त्यांचे कुटुंबिय चिंतेत होते.
त्यांच्या कुटुंबियांनी दिल्ली येथील भारतीय दुतावासाशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली होती. या शिवाय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार अजित गोपछडे, आमदार राजेश नवघरे यांना माहिती दिली होती. तर आमदार नवघरे यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करून केंद्र शासनाने त्याला भारतात परत आणण्यासाठी मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
दरम्यान, त्यानंतर शासनाने त्यांचा तेहराण दुतावासाशी संपर्क साधून माहिती घेण्यास सुरवात केली होती. यामध्ये योगेश यांना तेहराण येथे चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी दिल्ली येथील दुतावासाशी संपर्क साधला होता. त्यांची पत्नी श्रध्दा पांचाळ, भाऊ मंगेश पांचाळ, मेहूणे ॲड. सचिन जोशी यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. त्यानंतर योगेश हे सुखरुप असल्याची माहिती मिळाली होती.
दरम्यान, योगेश यांना तेहराण येथून मंगळवारी रात्री साडेदहा वाजता विमानात बसवून देण्यात आले. त्यांच्या कुटुंबियांनी तातडीने मुंबई येथे जाऊन बुधवारी सकाळी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. त्यांना पाहताच कुटुंबियांना अश्रू आनावर झाले होते. यावेळी त्यांच्या कुटुबियांनी शासनाचे तसेच मदत करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे आभार मानले.
तेहराण पोलिसांनी केली दोन वेळा चौकशी
तेहराण पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्या ठिकाणी पंधरा दिवसांच्या अंतराने दोन वेळा चौकशी केली. पोलिसांच्या ताब्यात असल्यामुळे कुटुंबियांशी संपर्क साधता आला नाही. मात्र त्या ठिकाणी पोलिसांनी सन्मानाचीच वागणूक दिल्याचे त्यांनी कुटुंबियांना सांगितले.