पितृपक्षातही भाजीपाल्याचे दर वधारले:पावसाचा परिणाम; गृहिणींच्या आर्थिक बजेटला फटका‎

2 hours ago 2
जिल्ह्यात गणेशोत्सव काळानंतर आता पितृपक्षातही भाज्यांच्या दरवाढीचा आलेख चढताच राहिला आहे. गृहिणींच्या स्वयंपाक घरातील बजेटला याचा फटका बसला आहे. दरवाढीमुळे भाज्या खरेदी करताना महिला हात आखडता घेत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. पितृ पक्षात पितरांना जेऊ घालण्यासाठी विविध प्रकारच्या भाज्यांची अधिक मागणी असते. त्यामुळे जिल्ह्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ झाली आहे. दुसरीकडे पावसामुळे पालेभाज्या खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. मागणी अधिक आणि आवक कमी असल्यामुळे बाजारात भाज्यांच्या किमती वाढलेल्या आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र, सद्य:स्थितीत पावसामुळे शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खामगावमध्ये बुलडाणा जिल्ह्यासह नाशिक, जळगाव खान्देश आदी भागांमधून भाजीपाला विक्रीसाठी आणण्यात येतो. तो भाजीपाला आणण्यासाठी खर्चही अधिक लागतो. पितृ पक्षात सद्य:स्थितीत बाजारात काही ठराविक भाज्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. यामध्ये दोडके, चवळीच्या शेंगा, भेंडी आदी भाज्यांना मागणी आहे. या भाज्यांचे दर ७० ते ८० रुपये किलो आहेत. श्राद्धाच्या नैवेद्यात समावेश असलेल्या भाज्यांमध्ये लाल भोपळा, भेंडी, चवळी, दोडके, कारले यांचा प्रामुख्याने समावेश असतो. श्राद्धाच्या दिवशी या सर्व भाज्यांची मिश्र भाजी करण्यासह भजी, वडा, खीर, कढी, वरण, भात, पोळी आदी खाद्यपदार्थ करण्याची परंपरा आजही कायम आहे. तर्पण व पिंडदान करण्यात येऊन त्यानंतर तो नैवेद्य कावळे किंवा गायींना घातला जातो.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article