Published on
:
07 Oct 2024, 3:50 am
Updated on
:
07 Oct 2024, 3:50 am
शहरातील ठिकठिकाणी रस्त्यावर भीक मागणारी लहान लहान बालके नेहमीच तुम्हा-आम्हा सगळ्यांच्या नजरेला पडतात. दयाबुद्धीने अनेक जण त्यांना एक- दोन रुपया देतात; मात्र या बाल भिकाऱ्यांच्या विश्वात ज्या काही संशयास्पद हालचाली चालतात, त्या विचारात घेता, गांभीर्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता वाटते.
कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन, महालक्ष्मी मंदिर परिसर, शहरातील प्रमुख वाहतूक सिग्नल, रंकाळा परिसर, काही नामांकित हॉटेल्स, शहरातील गजबजलेले परिसर, सीपीआर रुग्णालय परिसर, टेंबलाई मंदिर परिसर, शहरातील काही प्रमुख बस बांये या ठिकाणी साधारणतः तीन-चार वर्षांपासून ते आठ-दहा वर्षांपर्यंतची बालके भीक मागत असताना दिसतातयामध्ये काही मुलींचाही समावेश आहे. भीक मागणाऱ्या या बालकांच्या तोंडून दुसरा कोणताही शब्द बाहेर पडत नाही. कुणापुढेही हात करायचा आणि 'द्या' एवढा एकच शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडतो. बहुधा मराठी भाषेतील तेवढा एकच शब्द त्यांना येत असावा. शहरात जवळपास दोनशेंहून अधिक त्यांची संख्या असावी.
भीक मागणाऱ्या या मुलांचे वैशिष्ट्य म्हणजे दयाबुद्धीने कुणी यांना चहा, भजी, बडा अशासारखे काही खायला दिले तर ती लगेच कावरीबावरी होऊन भयभीत नजरेने आजूबाजूला बघू लागतात. बहुधा त्यांच्यावर कुणाचीतरी पाळत असावी, असे वाटते. कितीही मिनत्या केल्या तरी खायला दिलेला कोणताही पदार्थ ते घेत नाहीत की, त्याला हात लावत नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावरून सहज लक्षात येते की, त्यांच्या पोटात भूकेचा आगडोंब उठलाय; पण ते कुणीही दिलेला कोणताही पदार्थ कधीच घेऊन खात नाहीत. याचेही बहुधा त्यांना ट्रेनिंग' दिलेले असावे. ही भिकारी मुले आपापसात सहसा बोलत नाहीत आणि बोललीच तर ते कुठेतरी आडबाजूला जाऊन कुणी ऐकणार नाही, अशा बेताने आणि तेही अनोळखी भाषेतच.
यापैकी अनेक मुलांना कुणी त्यांचे नाव-गाव का? कुठे राहतोस? आई-वडील काय करतात? असा कोणताही प्रश्न विचारला तरी त्यांना त्यांची उत्तरे देता येत नाहीत, त्यामुळे बहुधा त्यांना मराठी भाषाच येत नसावी, कळत नसावी की कुणीतरी कुणाशीही न बोलण्याबद्दल त्यांना सक्त ताकीद दिली असावी. साधारणपणे दररोज या भिकारी मुलांची कमाई जवळपास दोन- तीनशे रुपयांपर्यंत जाते. याचा अर्थ, शहरातील या सर्व बाल भिकाऱ्यांची दिवसाची कमाई ही चाळीस ते साठ हजार रुपयांच्या आसपास आहे, असे समजण्यास हरकत नाही, सकाळी सहा-सात वाजल्यापासूनच त्यांची भिक्षांदेही सुरू होते ती सायंकाळी साडेसहा-सात वाजेपर्यंत.
यातील संशयाचा भाग म्हणजे, सायंकाळी सहा-साडेसहा वाजण्याच्या सुमारास एखादी व्यक्ती अथवा महिला हे बालभिकारी ज्या परिसरात फिरत असतात, त्या भागातील एका ठरावीक ठिकाणी येऊन उभा राहते. ठरल्याप्रमाणे वेळ झाली की, त्या त्या परिसरातील बालभिकारी त्या संबंधित व्यक्तीकडे येऊन आपली दिवसाची कमाई त्याच्याजवळील पिशवीत ओततात. त्यानंतर कधी रिक्षाने, तर कधी पायीपायीच या मुलांना घेऊन ती व्यक्ती निघून जाते.
मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन महालक्ष्मी मंदिर परिसरात दररोज सायंकाळी साडेसहा-सात वाजण्याच्या सुमारास अशा पद्धतीने बाल भिकाऱ्यांना एकत्र करून घेऊन जाणाऱ्या व्यक्ती बघायला मिळतात. याचा अर्थ, ही मंडळी या बालकांना सक्तीने दिवसभर भीक मागायला लावून त्यांच्या जीवावर ऐश करत असणार, हे उघडच आहे. भीक मागणाऱ्या अनेक मुलांची चेहरेपट्टी, वर्ण, त्यांच्या बोलण्याची ढब या बाबी विचारात घेतल्या, तर ही बालके निश्वितच महाराष्ट्रातील वाटत नाहीत, तर ती प्रमुख्याने उत्तर आणि दक्षिण भारतीय वाटतात.
या सगळ्या बाबी विचारात घेतल्या, तर असे मानण्यास मोठा वाव आहे की, कुणीतरी या बालकांना बळजबरीने भौक मागण्यास भाग पाडत आहे. त्या कामासाठीच बहुधा त्यांना परप्रांतातून अपहृत करून आणले असावे. या बाल भिकाऱ्यांचे महिन्याकाठचे बारा ते अठरा लाखांचे अर्थकारण विचारात घेता, मात निश्चितच काहीतरी तथ्य असावे. त्यामुळेच या बाल भिकाऱ्यांची आणि सायंकाळच्या वेळी त्यांना गोळा करून घेऊन जाणाऱ्या त्यांच्या तथाकथित पालकांची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे.