अमरावती : जुन्या वादातून युवकाची चाकूने वार करून हत्या, संशयित पोलिसांच्या ताब्यातFile Photo
Published on
:
07 Oct 2024, 6:30 am
Updated on
:
07 Oct 2024, 6:30 am
अमरावती : मॉन्टी उर्फ प्रेमराज याचा काही दिवसांपूर्वी त्याच्या परिसरातीलच राहणाऱ्या काही अल्पवयीन मुलांसोबत वाद झाला होता. अशातच रविवारी ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजत च्या दरम्यान मॉन्टी हा त्याच्या मित्रासोबत दुचाकीवरून जयस्तंभ चौक ते रॉयली प्लॉटवरील उड्डाणपुलावरून जात होता. तेव्हा काहीजणांनी त्याला अडविले आणि पुन्हा वाद घातला. हा वाद विकोपाला गेल्याने अडवलेल्या चार युवकांनी मॉन्टी वर चाकूने वार केले.
या हल्ला घटनेत अति रक्तस्त्राव झाल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला आधी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याला नागपूर येथे घेऊन जाण्यास नातेवाईकांना सांगितले. दरम्यान रुग्णवाहिकेद्वारे मॉन्टीला नागपूर येथे घेऊन जात असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे त्याला परत अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. येथे डॉक्टरांनी त्याला तपासून रात्री उशिरा मृत घोषित केले.
मॉन्टी उर्फ प्रेमराज याच्या मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईकांसह त्याच्या मित्रांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात गर्दी केली होती. नातेवाईकांचा रुग्णालयात आक्रोश केला. यानंतर लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याची मागणीही करण्यात आली. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती सिटी कोतवाली पोलिसांना देण्यात आली. या प्रकरणाचे गांभीर्य पाहता सिटी कोतवालीचे ठाणेदार कोटनाके हे आपल्या पथकासह तेथे दाखल झाले. दरम्यान पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढत त्यांना घरी पाठवले व मृतदेह शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आला. दरम्यान या हत्या प्रकरणात पोलिसांनी काही तासातच चार संशयीतांना ताब्यात घेतल्याचे समजले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.