महाराष्ट्र अदानीच्या घशात घालण्याचा मिंधे सरकारचा डाव; संजय राऊत यांचा हल्लाबोल

2 hours ago 1

चांद्यापासून बांद्यापर्यंत असलेला महाराष्ट्र गिळंकृत करण्याचे अदानीचे स्वप्न आहे. त्याची सुरुवात आता होत आहे. विदर्भात अनेक ठिकाणी अदानीचे बोर्ड दिसत आहेत. पंतप्रधान मोदी हे अदानीचे एजंट असल्याप्रमाणे कामे करतात. मात्र, महाराष्ट्रात जोपर्यंत हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यासारखे नेते आहेत, तोपर्यंत अदानीचे महाराष्ट्र गिळण्याचे स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही, असे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासादार संजय राऊत यांनी ठणकावले.

नागपूरमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण रविवारी संध्याकाळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते होणार आहे. मालवणच्या दुर्घटनेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे. मालवणच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाला. निकृष्ट कामामुळे पुतळा कोसळला. मुख्यमंत्री सांगतात की, ताशी 45 किमी वेगाचे वारे वाहत असल्याने पुतळा पडला. मात्र, आलेल्या अहवालानुसार पुतळा निर्मितीसाठी अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच पुतळा उभारतानाही योग्य व्यवस्था करण्यात आली नाही. पुतळ्यातील निकृष्ट साहित्य गंजल्यामुळेच पुतळा कोसळल्याचे आता उघड झाले आहे, असा हल्लाबोलही संजय राऊत यांनी केला.

नागपूरच्या कळमेश्वरमध्ये उद्धव ठाकरे यांच्याहस्ते लोकार्पण होणाऱ्या पुतळ्याची पाहणी करण्यात आली असून तो मजबूत असून उत्तमरित्या उभारण्यात आला आहे.आज उद्धव ठाकरे यांच्याहस्ते पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे. तसेच या दौऱ्यात उद्धव ठाकरे काही नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहे. तसेच शिवसेना ज्या जागा लढवण्यास इच्छुक आहे, तेथील संभाव्य उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत, अशी माहितीही राऊत यांनी दिली.

या देशाचे व्यवस्थापनच अदानीकडे आहे. आता हळूहळू छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र अदानीचा महाराष्ट्र करण्याचा घाट मिंधे, फडणवीस आणि अजित पवार घालत आहेत. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र चांद्यापासून बांद्यापर्यंत असे म्हणतात. त्यातील चांदा म्हणजे चंद्रपूर आहे. आता या चांद्यापासून महाराष्ट्र अदानीच्या घशात घालण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हा फक्त चंद्रपूरातील एक शाळा अदानीकडे देण्याचा विषय नाही. बांद्यापर्यंत त्यांना महाराष्ट्र गिळंकृत करायचा आहे. धारावी प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबई अदानीच्या घशात घालण्याचा घाट सुरू आहे. विदर्भात अनेक जमींनीवर अदानीचे बोर्ड लागले आहेत. शाळा, महाविद्यालये, अनेक वास्तू अदानीकडे जातील आणि मुख्यमंत्री दिल्लीचे बूट चाटतील, असा हल्लाबोलही संजय राऊत यांनी केला.

महाराष्ट्रात जोपर्यंत हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. उद्धव ठाकरे आणि आमच्यासारखे नेते आहेत. तोपर्यंत आदानीचे महाराष्ट्र गिळण्याचे स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही, असेही संजय राऊत यांनी ठणकावले. नरेंद्र मोदी हे अदानीचे एंजट म्हणून काम करतात, हे आता महाराष्ट्रातही दिसत आहे. तसेच अदानींचे इतर एजंट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असल्याने त्यांना महाराष्ट्राची होणारी लूट दिसत नसल्याचेही संजय राऊत म्हणाले.

लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील अनेक प्रकल्प थांबवण्यात आले आहे. राज्य सरकारी कर्मचारी, पोलीस, होमगार्ड यांना पगार मिळतील की नाही, अशी परिस्थिती या योजनेमुळे निर्माण झाली आहे. निवडणुकीत महिलांची मते मिळवण्यासाठी सर्व निधी या योजनेकडे वळवण्यात आला आहे. तसेच या योजनेचे श्रेय घेण्यासाठी तिन्ही गटांची चढाओढ लागली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बहिणींना लिहिलेल्या पत्रात योजनेतील मुख्यमंत्री शब्द काढण्यात आला आहे. तसेच मिंधे यांचा फोटोही हटवण्यात आला आहे. मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये या योजना सुरू होत्या. तशी योजना फक्त निवडणुकीसाठी राज्यात सुरू करण्यात आली आहे. राज्याच्या तिजोरीत पैसे नसताना फक्त मतांसाठी ही योजना रेटण्यात येत आहे. याचे फक्त तीनचार हप्तेच मिळण्याबाबत मोदी यांनीच वक्तव्य केले आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article