महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. जवळपास 15 ते 20 दिवसांच्या मोठ्या ब्रेकनंतर पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहराला झोडपलं आहे. मुंबईत आज संध्याकाळी सहा वाजेपासून धुवांधार पाऊस पडतोय. पावसासह प्रचंड वेगाने वारे वाहत आहेत. त्यामुळे मुंबईकरांची धाकधूक वाढली आहे. मुंबई महापालिकेकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. पण पाऊस राक्षसासारखा कोसळतोय. पावसामुळे मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल ट्रेनची वाहतूक सध्या तरी सुरु असली तरी तिचा वेग मंदावला आहे. मध्य रेल्वे मार्गावर कुर्ला रेल्वे स्थानकाच्या परिसरात रेल्वे रुळावर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सेकंड शिफ्ट करुन घरी जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होण्याची शक्यता आहे.
पावसाने थोडा वेळ उघडीप घेतली तर आजची रात्र सुरळीत जाऊ शकतो. पण सर्वच गोष्टी आपल्या हातात नसतात. संभाव्य परिस्थितीचा धोका लक्षात घेता मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. हवामान विभागाकडून मुंबईत पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईत उद्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्वत: याबाबत ‘टीव्ही 9 मराठी’ला माहिती दिली आहे. शिक्षण विभाग काही वेळातच याबाबतचा अधिकृत परिपत्रक जारी करणार असल्याची माहिती दीपक केसरकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली आहे.
“भारतीय हवामान खात्याने मुंबईत उद्या २६ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ८.३० पर्यंत अत्यंत जोरदार पावसाचा अंदाज (रेड अलर्ट) वर्तवला आहे. सबब, नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, ही विनंती. आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदतीसाठी १९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा”, असं आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आलं आहे.