Published on
:
24 Sep 2024, 4:30 pm
Updated on
:
24 Sep 2024, 4:30 pm
यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा
गाई चारण्याच्या वादातून गुरख्यानेच दुसऱ्या गुरख्याला लाकडी काठीने मारहाण करून खून केला. ही खळबळजनक घटना आर्णी तालुक्यातील अंजनखेड येथे रविवारी (दि.22) रात्री उघडकीस आली. लक्ष्मण परसराम बोटारे (वय ७०) रा. अंजनखेड असे मृत गुरख्याचे नाव आहे. तर लक्ष्मण चंपत सिडाम (वय.५९) असे संशयित आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी मृतकाच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून आणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, अंजनखेड येथील दोन गुराखी नेहमीप्रमाणे, रविवाराला सकाळी गाई चरण्यासाठी अंजनखेड येथील जंगलात घेऊन गेले. दरम्यान लक्ष्मण बोटरे यांच्या कळपातील एक गाय लक्ष्मण सिडाम यांच्या कळपामध्ये चरायला गेली असता, आरोपी लक्ष्मण सिडाम याने लक्ष्मण बोटारे यांच्याशी वाद घातला. हा वाद विकोपाला जाऊन, आरोपी लक्ष्मण सिडाम याने लक्ष्मण बोटारे यांना लाकडी काठीने मारहाण केली. यामध्ये लक्ष्मण बोटारे बेशुद्ध पडले. त्यांना त्याच अवस्थेत सोडून आरोपी घराकडे निघून आला.
रविवारी रात्री उशिरापर्यंत लक्ष्मण बोटारे गुरखी घरी न आल्याने कुटुंब चिंतेत पडले. त्यांनी लक्ष्मण यांचा शोध घेण्यासाठी जंगल गाठले. त्यांना लक्ष्मण बोटारे बेशुद्ध अवस्थेत आढळून आले, त्यानंतर मुलाने खांद्यावर उचलून गावात आणून उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय आर्णी येथे आणले. मात्र डॉक्टरांनी बोटरे यांना मृत घोषित केले. याप्रकरणी गजानन बोटारे रा. अंजनखेड यांनी आर्णी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असता, पोलिसांनी आरोपी लक्ष्मण सिडाम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पुढील तपास ठाणेदार केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्णी पोलिस करीत आहे.