Saamana Editorial connected Assembly Election 2024 : विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. त्यानंतर आता घडामोडींना वेग आला आहे. सगळ्याच्या राजकीय पक्षांकडून जिंकण्याचा दावा केला जात आहे. युद्धाचे रणशिंग फुंकले, हरण्याचे नावच नको, जिंकावेच लागेल, असं संजय राऊत म्हणालेत.
संजय राऊत, खासदारImage Credit source: ANI
युद्धाचे रणशिंग फुंकले, हरण्याचे नावच नको, जिंकावेच लागेल; निवडणुकीच्या पार्श्वभूमी राऊतांचा एल्गार
सामना अग्रलेख जसाच्या तसा
पुढील महिन्यात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होतील व त्या सध्याच्या भ्रष्ट तसेच घटनाबाहय़ सरकारविरुद्ध ईर्षेने लढवल्या जातील. महाराष्ट्र राज्याची इभ्रत ईरेला लागली आहे व मऱ्हाठी जनता पेटून उठली आहे. त्यामुळे राज्यात सत्तांतर घडविण्यासाठीच या निवडणुका होत आहेत . निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा केली . दिल्लीवाल्यांची सोय पाहूनच आता निवडणुकांच्या तारखा घोषित होतात . तशा त्या महाराष्ट्रातही झाल्या . युद्धाचे रणशिंग फुंकले गेले आहे . महाराष्ट्रासाठी हा लढा जिंकू किंवा मरू असाच आहे , पण हरण्याचे नावच नको . लढू आणि जिंकू . जिंकावेच लागेल!
काय होणार? कशा होणार? कधी होणार? होणार की नाही? अशा पेचात सापडलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका अखेर जाहीर झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र व झारखंडच्या निवडणुकांची घोषणा करून मोठाच तीर मारल्याचा आव आणला तरी गेल्या दहा वर्षांत निवडणूक आयोगाने मोदी-शहांचे भजन मंडळ म्हणूनच काम केले.
महाराष्ट्राच्या निवडणुका 20 नोव्हेंबर रोजी होतील. 23 नोव्हेंबरला मतमोजणी होईल व त्यानंतर नवे सरकार महाराष्ट्रात विराजमान होईल, असा लोकशाहीप्रधान कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला. निवडणुका निष्पक्षपातीपणे घेऊ वगैरे नेहमीचा राग आयोगाने आळवला आहे. ‘ईव्हीएम’मध्ये कोणतीही गडबड नसल्याचे विशेष प्रमाणपत्रही आयोगाने दिल्याने भाजप व त्यांच्या मिंधे गटाने त्यावर एक स्मितहास्य नक्कीच केले असेल.