पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पुरातन व मौल्यवान दागिन्यांचे मूल्यांकन करताना विष्णू सखाराम काळे, मनोज श्रोत्री व टीम.Pudhari Photo
Published on
:
01 Oct 2024, 1:08 am
Updated on
:
01 Oct 2024, 1:08 am
पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा
भाविक, वारकर्यांचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या खजिन्यात मौल्यवान व दुर्मीळ दागिने आहेत. या दागिन्यांच्या मूल्यांकनास सुरुवात झाली आहे. याकरिता अनुभवी तज्ज्ञ मूल्यमापनकार विष्णू काळे यांच्याकडून दागिन्यांचे मूल्यांकन सुरू केले आहे. हे सर्व दागिने इसवी सन 500 ते 1892 या कालावधीतील आहेत. हे दागिने मौल्यवान आहेत. जगात इतरत्र कोठेही उपलब्ध नसल्याचे मूल्यांकनकार काळे यांनी सांगितले. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज, समितीचे सदस्य, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या मान्यतेने व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली दागिने गाठवण्याचे व मूल्यांकनाचे काम सुरू केले आहे.
श्री विठ्ठल व रुक्मिणीमातेच्या खजिन्यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने, मोत्याचे हिरे, माणके, मोती अशी रत्नजडित अनमोल अशी आभूषणे आहेत. पूर्वीचे राजे, महाराजे, संस्थान अशा मोठमोठ्या व्यक्तींनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस विविध अलंकार भेट म्हणून 350-400 वर्षापूर्वी दिलेले आहेत. 1985 साली स्थापन झालेल्या मंदिरे समितीने आजपर्यंत ते सर्व दागिने दरवर्षी नवरात्र महोत्सवापूर्वी गाठवून घेवून काळजीपूर्वक जतन केले आहेत. आजही ते काम काळजीपूर्वक व व्यवस्थित केले जात आहे. 13 व्या शतकापासून 15 व्या शतकापर्यंतचे 325 अतिशय पुरातन, मौल्यवान दागिने विठ्ठल रुक्मिणीच्या खजिन्यात आहेत. यातील काही दागिने हे शिंदे-होळकर यांच्यासारख्या राजघराण्यातून अर्पण केलेले आहेत. मंदिर समितीचे सराफ खजिना विभाग आणि व्यवस्थापकांच्या उपस्थितीत हे मूल्यमापनाचे काम सुरू आहे. लवकरच या अनमोल दागिन्यांचे मोल निश्चित करण्यात येणार आहे.
हे करतात मूल्यांकनाचे काम
मूल्यमापनकार विष्णू काळे यांच्यासमवेत संजय कोकीळ (नित्य उपचार विभागप्रमुख), पांडुरंग बुरांडे (देणगी व छपाई विभागप्रमुख), ज्ञानेश्वर कुलकर्णी (जमीन व सोने चांदी विभागप्रमुख), दादा नलवडे (आस्थापनासह विभागप्रमुख), गणेश भणगे (समिती सराफ), दत्तात्रय सुपेकर (समिती सराफ).
श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दागिन्यांचे प्रथमच मूल्यांकन होत आहे. हा अतिशय स्वागतार्ह निर्णय आहे. हे मूल्यांकन पूर्ण होण्यास पुढील दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. अनपेक्षित घटना घडू नये म्हणून या दागिन्यांचा विमा उतरवला जाणार आहे.
- मनोज श्रोत्री, व्यवस्थापक