१. प्रत्येकाने आपल्या कुलाचाराप्रमाणे घटस्थापना आणि मालाबंधन करावे. शेतातील माती आणून, तिचा दोन बोटांचा जाड चौकोनी थर लावावा. त्यात पाच किंवा सात धान्ये घालावी. उदा. जवस, गहू, तीळ, मूग, राळे, सावे व चणे इ.
२. मातीचा किंवा तांब्याचा कलश घेऊन, त्यात पाणी, गंध, फुले, दूर्वा, अक्षता, सुपारी, पंचरत्ने किंवा नाणे इत्यादी वस्तू घालाव्यात आणि मातीच्या मधोमध कलशाची स्थापना करावी.
३. सप्तधान्ये आणि कलशस्थापनेचे वैदिक मंत्र येत नसल्यास पुराणोक्त मंत्र म्हणावेत. तेही येत नसल्यास, त्या त्या वस्तूचे नाम घेऊन ‘समर्पयामि’ म्हणून नाममंत्रांचा विनियोग करावा. कलशामध्ये माळ पोहोचेल, अशी बांधावी.
४. अखंड दीपप्रज्वलन, त्या देवीचे ग्रंथवाचन, देवीची भजने, स्तोत्रांची पारायणे करावीत. त्यामध्ये देवीचे माहात्म्यपठण (चंडीपाठ), सप्तशतीपाठ, देवी भागवत, ब्रह्मांडपुराणातील ललितोपाख्यानाचे श्रवण, ललितापूजन, सरस्वतीपूजन, उपवास, जागरण इत्यादी गोष्टी प्रत्येकाच्या क्षमता आणि सामर्थ्यानुसार कराव्यात.
अशी माहिती नागेशशास्त्री चौथाईवाले राक्षभुवन यांनी दिली.