Published on
:
17 Oct 2024, 2:34 am
Updated on
:
17 Oct 2024, 2:34 am
बेळगाव ः पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना पत्र पाठवून येत्या विधानसभेच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात सीमाप्रश्नासंबंधी आपापल्या पक्षाची भूमिका जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. याप्रकरणी बुधवारी (दि. 16) समितीच्या शिष्टमंडळाने इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली.
महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत प्रत्येक राजकीय पक्षाने सीमाप्रश्नी आपली भूमिका जाहीर करावी, अशी मागणी करत मध्यवर्ती म. ए. समितीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नाना पटोले यांना पत्रे पाठवली आहेत. शरद पवार इस्लामपूर येथे दौर्यावर आले होते. त्यावेळी समिती नेत्यांनी त्यांची भेट घेतली. त्यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांशी आपण चर्चा करून सीमाप्रश्नी भूमिका जाहीर करण्यात येईल, असे सांगितले. समितीच्या शिष्टमंडळात मध्यवर्ती म. ए. समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, सुनील आनंदाचे व विनोद आंबेवाडीकर यांचा समावेश होता.
काळ्यादिनी प्रतिनिधी पाठवा
1 नोव्हेंबर रोजी निघणार्या सीमावासीयांच्या काळ्या दिनाचा फेरीत सहभागी होवून जाहीर सभेत मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (शरदचंद्र पवार) प्रतिनिधी पाठवावा, अशी मागणीही यावेळी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे करण्यात आली.