Published on
:
12 Oct 2024, 3:48 am
Updated on
:
12 Oct 2024, 3:48 am
सेप्सिसचे प्रमुख कारण संसर्ग आहे. हा संसर्ग रक्ताशी निगडीत असतो. बॅक्टेरियल, व्हायरल, फंगल आदी कोणत्याही कारणांमुळे इन्फेक्शन होऊ शकते. गर्भधारणेच्या काळात महिलांना किडनी, युरिनरी ब्लॅडर, यूटीआय, जीटीआयमध्ये संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. संसर्ग वेळेत बरा झाला नाही, तर सेप्सिस विकसित होण्याचा धोका अधिक राहतो.
बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्झाने अलीकडेच एका मुलाखतीत दोन वर्षांपूर्वीचा बाळंतपणातील एक धोकादायक अनुभव शेअर केला होता. ती गर्भधारणेच्या काळात ‘सेप्सिस’ला बळी पडली होती. आपल्याला पाचव्या महिन्यांत अॅपेंडेक्टोमीसाठी दवाखान्यात जावे लागले असल्याचे सांगितले. अॅक्यूट बॅक्टोरियल इन्फेक्शनमुळे रुग्णालयात चकरा मारण्याची वेळ आल्याचेही तिने सांगितले. या स्थितीमुळे सहाव्या महिन्यातच ती ‘सेप्सिस’ला बळी पडली. तिला प्रीमॅच्यूर बाळाला जन्म द्यावा लागला. तिच्या प्लान्सेंटामधून रक्तस्त्राव सुरू झाला. सेप्सिस ही एक धोकादायक स्थिती आहे. बहुतांश लोकांना या स्थितीचे आकलन नाही. या त्रासाबद्दल जाणून घेऊ या.
सेप्सिस म्हणजे काय?
सेप्सिस ही गर्भवतीच्या आरोग्यातील संवेदनशील स्थिती आहे. कोणत्याही प्रकारच्या संसर्गाचा आपले शरीर सामना करत असते. अशा काळात इन्फेक्शनपासून आरोग्य सुरक्षित राहावे, यासाठी आपले शरीर अनेक प्रकारचे एंजाईम्स, प्रोटीन सोडत असते. अशा वेळी रिअॅक्शन इतकी जबरदस्त असते की, शरीर आपल्याच अवयवाला नुकसान पोहोचवण्याचे काम करू लागते. वेळेवर उपचार केले नाहीत, तर टिश्यू डॅमेज, ऑर्गन फेल्यूअरची समस्या निर्माण होऊ शकते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, संसर्गजन्य आजारात सेप्सिसच्या कारणांमुळे मृत्यूचा धोका हा अनेकपटीत असतो.
भारतात सेप्सिसमुळे होणारे मृत्यू
‘लान्सेट जर्नल’मध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार 2017 मध्ये जगभरात ‘सेप्सिस’चा त्रास 4.89 कोटी जणांना झाला आणि त्यावर्षी जगात झालेल्या 1.1 कोटी मृत्यूंमागे सेप्सिसचेच कारण असल्याचे आढळून आले. हे प्रमाण एकूण जागतिक मृत्यूंच्या सुमारे 20 टक्के होते. सेप्सिसशी सामना करणार्यापैकी अनेकांंचा मृत्यू आयसीयूमध्ये होतो. ही बाब सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक आहे. जागतिक आरोग्यतज्ज्ञांच्या मते, 2050 पर्यंत कर्करोग आणि हृदयविकारापेक्षा सेप्सिसमुळे होणारे मृत्यूचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे.
गर्भवतींसाठी जोखीम सेप्सिसचे प्रमुख कारण संसर्ग आहे. हा संसर्ग रक्ताशी निगडीत असतो. बॅक्टेरियल, व्हायरल, फंगल आदी कोणत्याही कारणांमुळे इन्फेक्शन होऊ शकते. गर्भधारणेच्या काळात महिलांना किडनी, युरिनरी ब्लॅडर, यूटीआय, जीटीआयमध्ये संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. संसर्ग वेळेत बरा झाला नाही, तर सेप्सिस विकसित होण्याचा धोका अधिक राहतो. याशिवाय महिलेस मार लागल्यास आणि त्या जखमेत संसर्ग झाल्यास व तो बरा न झाल्यास सेप्सिस होण्याची भीती राहते. याशिवाय एखाद्या व्यक्तीला न्युमोनिया असेल, साखरेची पातळी वाढली असेल, इम्युनिटी कमकुवत असेल, अवयव प्रत्यारोपण झाले असेल, तर अशा लोकांत देखील सेप्सिसची जोखीम वाढते.
लक्षणे काय?
खूप ताप येणे, अंगदुखी, अशक्तपणा, रक्तदाब कमी होणे, लघवी कमी येणे, पित्ताचा त्रास, मळमळ होणे हृदयाचे ठोके वाढणे, श्वास घेण्यास त्रास होणे, योनीतून रक्तस्त्राव, ऑक्सिजन पातळी घसरणे, बेशुद्ध होणे आदी लक्षणे ही सेप्सिसची असू शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करायला हवा.
बचाव कसा करावा?
शरीराची विशेष निगा राखावी, गर्भवतींनी न चुकवता सर्व प्रकारचे लसीकरण करून घ्यावे, कोणतीही जखम किंवा मार लवकर बरा नाही झाल्यास तज्ज्ञांशी सल्लामसलत करावी. रक्तदाब कमी झाल्यास तज्ज्ञांशी संपर्क साधावा. वेळेवर वैद्यकीय तपासणी करणे, डॉक्टरांच्या निर्देशांचे पालन करणे, औषधे वेळेवर घेणे या आधारावर सेप्सिसचा धोका टळू शकतो.